'मुलींना चुकीचा स्पर्श कराल तर... हात तोडू...!'

राजभर पिता-पूत्र हे वादग्रस्त विधानासाठीच प्रसिद्ध आहेत. अरविंद यांचे वडील ओमप्रकाश यांनीही नुकतेच एक अवैज्ञानिक विधान केले. त्यांच्या या विधानावरून त्यांच्यावर प्रचंड टीकाही होत आहे.

Updated: May 22, 2018, 08:28 AM IST
'मुलींना चुकीचा स्पर्श कराल तर... हात तोडू...!' title=

लखनऊ : उत्तर प्रदेशातील योगी सरकारमधील कॅबिनेट मंत्री ओमप्रकाश राजभर यांचे पूत्र आणि सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे नेते अरविंद राजभर हे त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आहेत. 'आपला पक्ष सत्तेत आला तर, आपण महिलांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणाऱ्यांचे हात तोडू', असे विधान करून अरविंद यांनी खळबळ उडवून दिली आहे. दरम्यान, राजभर पिता-पूत्र हे वादग्रस्त विधानासाठीच प्रसिद्ध आहेत. अरविंद यांचे वडील ओमप्रकाश यांनीही नुकतेच एक अवैज्ञानिक विधान केले. त्यांच्या या विधानावरून त्यांच्यावर प्रचंड टीकाही होत आहे.

वडीलांच्या पावलावर पाऊल

चंदौली येथील एका कार्यक्रमात बोलताना अरविंद राजभर यांनी सांगितले की, 'जो कोणी व्यक्ती महिला आणि मुलींना वाईट किंवा चुकीचा स्पर्श करेन त्याचे मी हात तोडेन. आपला पक्ष सत्तेवर आल्यावर आपण त्याबाबत नक्कीच महत्त्वपूर्ण पाऊल उचलू.'

'बाप तसा बेटा'

दरम्यान, अरविंद राजभर यांचे वडील कँबिनेट मंत्री ओमप्रकाश राजभर हेसुद्धा वादग्रस्त विधाने करत असतात.  बलिया जिल्ह्यातील एका सभेत लोकांना संबोधित करताना नुकतेच त्यांनी भलतेच विधान केले आहे. 'जर कोणता व्यक्ती दुसऱ्या कुटल्या पक्षाच्या सभेला गेला तर, त्यांना मी शाप देईन. त्या लोकांना माझा शाप लागल्यावर त्यांना कावीळ होईल आणि ते गंभीर आजारी पडतील', असे काहीसे विक्षिप्त आणि अवैज्ञानिक विधान ओमप्रकाश राजभर यांनी केले आहे.