पाहा 'हँड टू हँड' चकमकीत 'जैश'च्या पाच दहशतवाद्यांचा खात्मा करणारे वीर

थरार..... देशरक्षणाचा, कर्तव्याचा आणि घुसखोरांना धडा शिकवण्याचा..   

Updated: Apr 7, 2020, 03:37 PM IST
पाहा 'हँड टू हँड' चकमकीत 'जैश'च्या पाच दहशतवाद्यांचा खात्मा करणारे वीर  title=

श्रीनगर : जम्मू - काश्मीर येथे अनेकदा होणाऱ्या दहशतवादी कारवाया भारतीय सैन्याकडून हाणून पाडण्यात आल्या आहेत. त्यातच सध्या लष्करातील ४ पॅराशूट रेजिमेंटच्याच वीर जवानांची चर्चा सध्या सुरु आहे, ज्यांनी नुकतंच एका हँड टू हँड कारवाईत जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला. 

खराब हवामान, जवळपास आठ फूट साचलेला बर्फ आणि कमी दृश्यमान असतानाही स्पेशल फोर्सच्या या जवानांनी दहशतवाद्यांचा खात्मा केलाच. काश्मीरच्या उत्तरेकडे या जवानांनी प्राण पणाला लावण्यापूर्वी घुसखोरी करणाऱ्यांना त्यांच्या मनसुब्यानिशी ठार केलं. 

२ एप्रिलला कुपवाडा जिल्ह्यातील केरान सेक्टरजवळून काही दहशतवादी घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळताच बलिदान परम धर्म या घोषवाक्याला सार्थ ठरवत हे जवान संघर्षासाठी सज्ज झाले. पण, दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरमध्ये परतले आहेत की कमी दृश्यमानाचा आणि दाट धुरक्याचा फायदा घेऊन देवदार वृक्षाच्याच दाटीवाटीत लपले आहेत याबाब मात्र काहीच स्पष्टता नव्हती अशी माहिती काही अधिकाऱ्यांनी पीटीआयला दिली. 

२ एप्रिलच्या दिवशी त्या ठिकाणी कोणतीही हालचाल झाली नाही. त्यामुळे दहशतवादी परतल्याचा जवानांचा समज झाला. पण, ३ एप्रिलच्या दिवशी त्या ठिकाणी काही हाचलाची झाल्या. गुज्जर ढोक या भागातील हालचाल निरिक्षणात आली होती. लगेचच हल्ल्याची आखणी झाली. शमशाबरी पर्वतरांगांवर ४ पॅराशूट रेजिमेंटचे हे जवान पोहोचले. तिथूनच दहशतवाद्यांवर चाल करण्याची रणनिती त्यांनी आखली. 

'धोक'मध्ये असणाऱ्या दहशतवाद्यांनी शमशाबरी पर्वतरांगांवरून ४ एप्रिलला स्पेशल फोर्सच्या या जवानांच्या येण्याची गती पाहिली आणि लगेचच त्यांनी गोळीबारास सुरुवात केली. बारामुल्ला येथील काला पहाड भागापासून शमशाबरीच्या पर्वरांगांची सुरुवात होते ते अगदी उत्तर काश्मीरच्या वज्र टॉपपर्यंत जाऊन थांबतात. हा भाग म्हणजे लडाखमधील कारगील भागाची सीमा. जवळपास हजारो फुटांच्या पर्वतरांगाचांचा हा भाग भारत- पाकिस्तान नियंत्रण रेषेच्या कक्षेत येतो. 

 

सुभेदार संजीव कुमार (हिमाचल प्रदेश), हवलदार देवेंद्र सिंह (उत्तराखंड), पॅरा ट्रूपर  बाल क्रिष्णन (हिमाचल प्रदेश), अमित कुमार (उत्तराखंड) आणि छतरपाल सिंह (राजस्थान) यांनी अखेर दहशतवाद्यांवर हल्ला चढवला. त्यांनी दहशतवाद्यांचा खात्मा केला. यामध्येच गोळीबारादरम्यान, सुभेदार यांना वीरमरण आलं. तर, उर्वरित चार लढवैय्यांना रुग्णालयात नेत असताना आणि काहींना रुग्णालयात दाखल केल्यावर वीरमरण आलं. 

सैन्यदलाच्या प्रवक्त्यांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार बर्फाच्छादित प्रदेशात अनेक आव्हानं असतानाही नियंत्रण रेषेपाशी करण्यात आलेल्या दहशवादी विरोधी कारवाईत दहशतवाद्यांची संपूर्ण तुकडी नष्ट करण्यात आली.