केजरीवाल यांना पाठिंबा; चार मुख्यमंत्र्यांनी घेतली मोदींची भेट

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुरु केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशीतील चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा दिलाय. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 17, 2018, 03:36 PM IST
केजरीवाल यांना पाठिंबा; चार मुख्यमंत्र्यांनी घेतली मोदींची भेट title=

नवी दिल्ली : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुरु केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशीतील चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा दिलाय. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दरम्यान, या चारही मुख्यमंत्र्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या धरणे आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी राजभवनात त्यांची भेट घेण्याचे ठरविले होते. त्यांनी त्यासाठी नायब राज्यपाल अनिल बैजल यांना तसे पत्रही लिहिले. मात्र त्यांना केजरीवाल यांची भेट घेण्यास राज्यपालांनी नकार दिला. त्यामुळे या चारही मुख्यमंत्र्यांनी केजरीवाल यांची भेट घेतली नाही.

दिल्लीत राजकीय चर्चांना उधाण

कर्नाटक, केरळ, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची शनिवारी दिल्लीच्या आंध्र प्रदेश भवनामध्ये बैठक झाली. हे सर्व मुख्यमंत्री निती आयोगाच्या बैठकीसाठी आले होते. मात्र, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी आणि  आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू अचानक भेटल्यामुळे राजधानी दिल्लीमध्ये तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

केजरीवाल यांचा हल्लाबोल

आज संध्याकाळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यासाठी चार राज्यांचे मुख्यमंत्री दिल्लीत आले. मात्र, त्यांना नायब राज्यपालांमुळे भेट मिळू शकली नाही. तसेच  बैजल यांनाही भेटण्यासाठी परवानगी दिली नाही. यावर केजरीवाल यांनी ट्विट करून, हे सगळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सांगण्यावरून होत आहे, असा थेट हल्लाबोल केलाय.

नायब राज्यपाल हे स्वतःचा निर्णय घेत नाही आहेत. ते पंतप्रधानांच्या आदेशावर चालतात, अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी भेटण्यासाठी वेळ दिला नाही. अशी परिस्थिती कोणवरही येऊ शकते. गेल्या चार महिन्यापासून दिल्लीतील काम बंद आहे. केंद्र सरकार सुडबुद्धीने वागत आहे.

ममता, कुमारस्वामींची मोदींवर टीका

राजधानी दिल्ली सारख्या छोटया राज्याचे म्हणणे ऐकले जात नसेल तर मोठया राज्यांचे काय होणार? असा सवाल कोलकाताच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. तर, कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी म्हणाले की, आम्ही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा देण्यासाठी आलो आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याकडे लक्ष द्यावे आणि समस्या सोडवावी, अशी मागणी त्यांच्याकडे केली.