गंगा नदीनं तळ गाठताच समोर आला रेल्वे रुळ; इथं कधी धावली Train? सर्वांनाच पडला प्रश्न

Railway Line under Ganga River : हरिद्वारमध्ये हर की पौडी इथं गंगा नदीचं पात्र तळाशी गेलं असून, आता इथं एक वेगळीच चर्चा सुरू आहे.   

सायली पाटील | Updated: Oct 18, 2024, 12:51 PM IST
गंगा नदीनं तळ गाठताच समोर आला रेल्वे रुळ; इथं कधी धावली Train? सर्वांनाच पडला प्रश्न  title=
haridwar railway line under ganga har ki paudi

Railway Line under Ganga River : गंगा नदीचं पात्र कायमच अभ्यासक आणि निकीक्षकांसाठी कुतूहलाचा विषय ठरलं आहे. याच कुतूहलात आता आणखी एका गोष्टीची भर पडत आहे आणि यामागचं निमित्त ठरतंय ते म्हणजे नदीपात्र आटल्यामुळं दृष्टीस पडणारे रेल्वे रुळ. 

हरिद्वारमध्ये गंग कालवा बंद केल्यानंतर हर की पौडी आणि व्हिआयपी घाट इथं असणारं गंगा नदीचं पात्र तळाशी गेलं आहे. गंगेचा तळ दिसत असल्यामुळं आता अनेक गोष्टी नजरेत येत असून, लक्ष वेधणारा घटक म्हणजे नदीच्या तळाशी गेलेल्या पात्रात दिसणारा रेल्वे रुळ. अनेकांनीच या पाण्याखाली असणाऱ्या रेल्वे रुळा बाबत कुतूहलपूर्ण प्रश्न विचारण्यास सुरुवात केली असून, इथं कधी रेल्वे चाललीये का? असा प्रश्नही उपस्थित केला. 

हरिद्वार रेल्वे स्थानकापासून साधारण 3 किमी अंतरावर आढळलेले हे रेल्वे रुळ नागरिकांमध्ये उत्सुकता आणि कुतूहलाला वाव देताना दिसत आहेत. सोशल मीडियावरही अनेकांनीच या फोटो शेअर केला असून, अनेक दावेही केले आहेत. हरिद्वार येथील जाणकारांच्या मते 1850 च्या दरम्यान गंग कालव्याच्या निर्मितीवेळी या रुळांवर हातगाड्या चालवून त्या माध्यमातून कालव्याच्या निर्मितीमध्ये सामानाची ने- आण केली जात असे. भीमगौडा बैराजपासून डाम कोठीपर्यंत धरण आणि तटबंदी बनवण्याचं काम पूर्ण झाल्यानंतर इंग्रज अधिकारी निरीक्षणासाठी या गाड्यांचा वापर करत होते. 

हेसुद्धा वाचा : 'इथं खूप अपमान पचवावा लागतो' लकी अलीनं समोर आणला बॉलिवूडचा खरा चेहरा 

गंग कालवा हा लॉर्ड डलहौजी यांचा एक मोठा प्रकल्प होता. कोटले नावाच्या इंजिनिअरच्या निरीक्षणाअंतर्गत या प्रकल्पाचं काम पार पडलं. ब्रिटीशकालीन भारतात अशा अनेक प्रकल्पांना पूर्णत्वास नेलं गेलं त्यांनी आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार रुडकी कलियरपाशी देशातील पहिला रेल्वे रुळ बसवण्यात आला होता, पण त्याला ही ओळख मिळू शकली नाही.