राजस्थान विधानसभा अधिवेशनासाठी काँग्रेसची बैठक, पण पायलट गटाला आमंत्रण नाही

 राजस्थानमधील राजकीय संघर्ष खरंच संपला आहे का?

Updated: Aug 13, 2020, 08:36 AM IST
राजस्थान विधानसभा अधिवेशनासाठी काँग्रेसची बैठक, पण पायलट गटाला आमंत्रण नाही title=

जयपूर : राजस्थानमधील राजकीय संघर्ष संपल्याचा दावा केला जात असला तरी सर्व काही ठीक आहे असं बोलता येणार नाही. पायलट गट आणि गहलोत गट आपापसात एकत्र आले असते तर तसं म्हणता आलं असतं परंतु अजूनही दोन्ही गटांमध्ये अंतर कायम आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या विधानसभा अधिवेशनाची तयारी सुरू झाली आहे.

गेहलोत गटाचे आमदार जे आतापर्यंत जैसलमेरमधील हॉटेलमध्ये होते. सरकार टिकेल की पडेल याबाबत अनेक आमदारांना शंका होती. परंतु आता चिंता दूर झाली आहे. जयपूरला परतण्यापूर्वी आमदारांनी जैसलमेरमध्ये खरेदी केली. त्यानंतर मंदिरातही पूजा केली.

गेहलोत गटातील सर्व आमदार त्यानंतर जयपूरच्या फेअरमोंट हॉटेलमध्ये परतले. दरम्यान, पायलट व त्यांचे समर्थक आमदार मंगळवारी संध्याकाळपासून जयपूरमध्ये हजर आहेत, पण अद्याप दोन्ही गटाचे मनमिलन झालेले नाही.

काँग्रेसचे आमदार विधानसभा अधिवेशनाच्या रणनीतीबाबत बैठक घेणार आहेत. पण मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीला पायलट गटाच्या आमदारांना बोलवलं नसल्याचं कळतं आहे. गेहलोत यांना कदाचित त्यांची ताकद दाखवण्याची ही संधी असेल.

मुख्यमंत्री अशोक गहलोत, जे झालं तो इतिहास होता, सगळ्यांना सन्मान मिळेल असा दावा करत असले तरी त्यांच्या गटातील आमदार अजूनही पायलट यांच्यावर टीका करत आहेत. सचिन पायलट यांना परत कोणत्या पदावर नियुक्त केलं जातं यावरुन देखील दोन्ही गटामध्ये संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही.