तुम्हीसुद्धा हर्बल उत्पादन वापरताय, सावधान! अशी होतेय ग्राहकांची फसवणूक

हर्बल उत्पादनाच्या नावाखाली सुरू असलेल्या गोरखधंद्याची. सर्व आजारांवरचं रामबाण औषध म्हणजे हर्बल उत्पादनं असं मानलं जातंय... जगभरात तब्बल  200 अब्ज अमेरिकन डॉलर्स एवढी हर्बल औषधांची उलाढाल होते. मात्र हर्बल उत्पादनाचं लेबल लावून ग्राहकांची  फसवणूक होतेय

Updated: Aug 3, 2023, 07:56 PM IST
तुम्हीसुद्धा हर्बल उत्पादन वापरताय, सावधान! अशी होतेय ग्राहकांची फसवणूक title=

Trending News : मुंबईच्या मिस डिमेलो.. वय 51 वर्षं... त्यांना मधुमेह (Diabetes) आहे. जानेवारीत व्हॉट्सअॅपवर हर्बल उत्पादनाची (Herbal products) एक जाहिरात आली. त्यात दावा करण्यात आला होता की, मधुमेह देखील बरा होऊ शकतो. त्यांनी हे हर्बल औषध मागवलं. मात्र त्यांची रक्तातली साखर कमी झाली नाही, उलट लिड पॉयझनिंग या गंभीर आजाराच्या त्या शिकार बनल्या. किडनी आणि यकृतावर त्याचा वाईट परिणाम झाला. केवळ डायबिटीस नाही, तर सर्व आजारांचा इलाज म्हणून हर्बल उत्पादनं बाजारात उपलब्ध आहेत. चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी, मुरूमांचा इलाज करण्यासाठी, लठ्ठपणा कमी करण्यासाठी, डोळ्यांचं इन्फेक्शन असो की त्वचा विकार, तुम्ही रोगाचं नाव घ्या, बाजारात त्यावर हर्बल औषधं सहज मिळतील. 

रात्री उशिरा टीव्ही जाहिरातींमध्ये हर्बलच्या (Herbal Advertisements) नावानं अशी उत्पादनं दाखवली जातात आणि साधेभोळे लोक या दाव्यांना भुलतात. एका सर्वेनुसार, जगभरात सुमारे 4 अब्जाहून अधिक लोक चांगल्या आरोग्यासाठी पारंपरिक औषधं आणि उपचार पद्धतींवर विश्वास ठेवतात. अशा परिस्थितीत हर्बल औषधं आणि उत्पादनांचा बाजार खुप मोठा आहे

अश्वगंधा, अर्जुन झाडाची साल, एफेड्रा, तुळस, आंवळा, कडू संत्र अशा जडीबुटी आरोग्यवर्धक म्हणून विकल्या जातात. इम्युनिटी (Immunity) वाढवण्याच्या नावानं अश्वगंधाची विक्री होते. खरं तर रोगांचा मुकाबला शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती करते. डॉक्टरांचं म्हणणं आहे की, कडू संत्र, एफेड्रा, अश्वगंधा यासारख्या जडीबुटींमुळं हृदयविकाराचा धोका वाढतो. लठ्ठपणा, मधूमेह, रक्तदाब यासारख्या आजारांसाठी हर्बल उत्पादनं टाळली पाहिजेत. कारण त्यामुळं अडचणी आणखी वाढू शकतात.

शरीरातील रक्त डिटॉक्स करण्याचं प्रमाण अलिकडच्या काळात वाढलंय. चांगले चांगले लोक कारलं आणि लिंबाच्या पानांचा रस पिऊन शरीर डिटॉक्स करतात. प्रत्येक मॉर्निंग वॉक पार्कजवळ असे दोन स्टॉल लागलेले असतात, जिथं विविध प्रकारची पानं, औषधी वनस्पती बारीक कुटून त्यांचा रस डिटॉक्स स्मुदी म्हणून विकला जातो. मात्र अशा स्मुदींमुळं यकृताचे आजार बळावल्याच्या तक्रारी वाढल्यात.

हर्बल उत्पादनांची सर्वात मोठी समस्या ही आहे की, बहुतेक जडी-बुटींवर आधुनिक संशोधन झालेलं नाही. शेकडो वर्षांपूर्वी लिहिलेल्या पुस्तकांमध्ये या जडीबुटींचा उल्लेख आहे. त्याच आधारे आणि ऐकीव माहितीवर त्यांचा वापर होतो. एवढंच नाही तर हर्बल उत्पादनासाठी कोणतंही परिमाण निश्चित केलेलं नाही. अनेक आयुर्वेदिक आणि हर्बल औषधांमध्ये अॅलोपथी औषधांचा वापर होत असल्याचंही धक्कादायक वास्तव समोर आलंय.

हर्बल उत्पादनांवर संपूर्ण बंदी घातली पाहिजे, असं आमचं म्हणणं नाही. मात्र या औषधांचं स्टँडर्ड निश्चित करण्याची वेळ नक्कीच आलीय. काय हर्बल आहे आणि काय नाही, हे स्पष्ट व्हायलाच हवं...