Corona Update : दिल्लीनंतर राज्यातही कोरोना रूग्णांमध्ये वाढ, महाराष्ट्र सरकार सतर्क

आतापर्यंत आलेल्या तीनही लाटांमध्ये सर्वाधिक रूग्णसंख्या महाराष्ट्रात दिसून आली होती  

Updated: Apr 21, 2022, 07:59 PM IST
Corona Update : दिल्लीनंतर राज्यातही कोरोना रूग्णांमध्ये वाढ, महाराष्ट्र सरकार सतर्क title=

Corona Update : देशातून कोरोनाचा (Corona) बिमोड झालाय असं वाटत असतानाच एका धक्कादायक बातमीनं सर्वांनाच हादरवून सोडलंय. दिल्लीत (Delhi) सलग दुसऱ्या दिवशी 24 तासात दोन हजारांपेक्षा जास्त रूग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यातही दिवसभरात 162 नवे रूग्ण आढळून आले आहेत. 

आतापर्यंत आलेल्या तीनही लाटांमध्ये सर्वाधिक रूग्णसंख्या महाराष्ट्रात दिसून आली. त्यामुळे राज्य सरकार सतर्क झालंय. पुढील आठवड्यात महत्वाची बैठक बोलाण्यात आलीय. या बैठकीत मास्कबाबत (Mask) निर्णय होण्याची शक्यता आहे. याशिवाय संभाव्य चौथ्या लाटेचा (Corona Fourth Wave) धोका लक्षात घेता राज्यात पुन्हा निर्बंध लागू होऊ शकतात. 

दिल्लीत कोरोना रुग्णांमध्ये वाढ
दिल्लीत बुधवारी कोरोना रूग्णांची संख्या 600 होती. तर गुरूवारी म्हणजेच अवघ्या 24 तासांत हीच रूग्णसंख्या दुप्पट झालीय. दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेची सुरूवातही अगदी अशीच काहीशी होती. 27 मार्चला कोरोनाची दुसरी लाट आली तेव्हा 1 हजार 558 नवे रूग्ण आढळून आले. 

पुढच्या दोन दिवसात ही रूग्णवाढ 1 हजार 904 इतकी झाली तर 9 दिवसांत हा आकडा 5 हजारांवर जाऊन पोहचला. तिसऱ्या लाटेतही 30 डिसेंबरला दिल्लीत 1313 रूग्ण आढळले आणि दुस-याच दिवशी ही रूग्णसंख्या 1796वर पोहचली. पुढच्या चार दिवसात रूग्णांचा आकडा 5 हजार 481 वर जाऊन पोहचला होता. 

चौथ्या लाटेचा धोका?
यातून चौथ्या लाटेचे स्पष्ट संकेत मिळतायेत. दिल्लीत वाढत असलेला कोरोना मुंबईपर्यंत पोहचायला वेळ लागणार नाही. त्यामुळे लोकांनी सतर्क राहणं आवश्यक आहे. निर्बंधांचा फटका प्रत्येकालाच बसलाय. त्यामुळे देशात चौथी लाट आली तर ते कुणालाच परवडणारं नाही.