'तुम्ही फक्त आकडे फेकत...,' Animal चित्रपटाच्या यशामुळे मनोज वाजपेयी व्यथित, म्हणाला 'तुम्ही संस्कृती...'

बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयीने पुन्हा एकदा 'अ‍ॅनिमल' चित्रपटाच्या निमित्ताने बॉक्स ऑफिवरील कमाईच्या आकड्यांवरुन होणाऱ्या अवाजवी चर्चेला नापसंती दर्शली आहे. याचं कारण अ‍ॅनिमल'सह त्याचा 'जोराम' प्रदर्शित झाला आहे.   

शिवराज यादव | Updated: Dec 19, 2023, 04:56 PM IST
'तुम्ही फक्त आकडे फेकत...,' Animal चित्रपटाच्या यशामुळे मनोज वाजपेयी व्यथित, म्हणाला 'तुम्ही संस्कृती...'  title=

बॉलिवूडमधील गुणी अभिनेता मनोज वाजपेयी सध्या त्याच्या 'जोराम' चित्रपटाला मिळालेल्या यशाचा आनंद घेत आहे. पण देवाशिश मखिजा यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मात्र संघर्षाचा सामना करावा लागत आहे. 'अ‍ॅनिमल'च्या वादळात जोरामला फार स्क्रीन्स मिळालेल्या नाहीत. रणबीर कपूरची प्रमुख भूमिका असणारा 'अ‍ॅनिमल' आणि विकी कौशलचा 'सॅम बहादूर' प्रदर्शित झाल्यानंतर एका आठवड्याने 'जोराम' प्रदर्शित झाला होता.

'अ‍ॅनिमल'सोबत असलेल्या स्पर्धेमुळे जोराम चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फार स्क्रीन न मिळाल्यासंबंधी मनोज वाजपेयीला विचारण्यात आलं. यावेळी त्याने सांगितलं की, "अ‍ॅनिमल आणि सॅम बहादूर हे दोन मोठे चित्रपट असल्याचं आम्हाला माहिती होतं. या दोन्ही चित्रपटांवर फार पैसे खर्च करण्यात आले होते. अ‍ॅनिमलबद्दल अद्यापही फार चर्चा सुरु आहे. पण आम्ही आमच्या चित्रपटावर तितका पैसा खर्च करु शकत नव्हतो. याचं कारण जोराम एक वेगळा चित्रपट आहे. आम्ही चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी फक्त ठराविक रक्कमच खरेदी करु शकत होतो",

"आम्हाला आमच्या चित्रपटावर फार भार टाकायचा नव्हता. आम्ही त्याबद्दल फारच व्यवाहारिक आणि वास्तववादी होतो. आम्हाला माहिती होतं की, आम्ही परिस्थिती आणि आमच्या चित्रपटाबद्दल फार आदर्श असू शकत नाही. त्यामुळे आमच्यावर तसा फार दबाव नव्हता आणि लवकरात लवकर नफा कमवायचा होता," असं मनोज वाजपेयी म्हणाला.

दरम्यान, मनोज वाजपेयीने बॉक्स ऑफिसवरील आकड्यांसंबंधी होणाऱ्या अतीचर्चेवर पुन्हा एकदा आपली नापसंती दर्शवली. यामुळे सिनेमाचे पावित्र्य नष्ट झालं असल्याचं मत त्याने व्यक्त केलं. “मी नेहमीच बॉक्स ऑफिसबद्दल असणाऱ्या वेडाच्या विरोधात बोललो आहे आणि नेहमीच असा विश्वास ठेवला आहे की यामुळे आपल्या देशातील चित्रपट निर्मितीची संस्कृती नष्ट झाली आहे. लोकांच्या चेहऱ्यावर नंबर फेकणे ही योग्य गोष्ट नाही,” असं स्पष्ट मत मनोज वाजपेयीने मांडलं आहे.

बॉक्स ऑफिसवरील कमाईचा लोकांवर होणाऱ्या नकारात्मक परिणामावर भाष्य करताना मनोज वाजपेयीने लोकांसोबत कधीही चर्चा करताना ते चित्रपटाने किती कमावले याचा उल्लेख होतो असं सांगितलं. "जर चित्रपटाने 100 कोटी किंवा त्यापेक्षा अधिक कमावले असती तर तो फार चांगला चित्रपट आहे आणि तो देशातील सर्व सन्मानांसाठी पात्र ठरला आहे असं समजलं जातं," अशी खंत मनोज वाजपेयीने मांडली. 

रेकॉर्ड करण्याच्या गरजेमुळे चित्रपट निर्माते आता फक्त पैशांचा विचार करत असून, गोष्ट सांगण्याच्या कलेपासून दूर होत चालले आहेत असंही मनोज वाजपेयीने सांगितलं. "आता जेव्हा चित्रपट तयार होत असतो तेव्हा लोकांना मूर्ख बनवून चित्रपटगृहापर्यंत कसं आणायचं आणि तुम्ही पहिल्या दिवशी 10 कोटींपेक्षा जास्त कमावले आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला जातो," असं मनोज वाजपेयी म्हणाला.