'फौज-द बॅटल ऑफ हिली' सांगणार भारतीय सैन्यांची शौर्यगाथा

 १९७१ मध्ये भारत पाकिस्तानमध्ये झालेले एक महत्वपूर्ण युद्ध ठरले. याच युद्धावर आधारित 'फौज-द बॅटल ऑफ हिली' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Updated: Nov 7, 2023, 05:16 PM IST
'फौज-द बॅटल ऑफ हिली' सांगणार भारतीय सैन्यांची शौर्यगाथा title=

मुंबई : १९७१ मध्ये भारत पाकिस्तानमध्ये झालेले एक महत्वपूर्ण युद्ध ठरले. याच युद्धावर आधारित 'फौज-द बॅटल ऑफ हिली' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नवीन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले असून स्वामी चरण फिल्म्स, एम एन तातुसकर फिल्म्स प्रॉडक्शन, हर्ष जोशी प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांचे आहे. २०२४ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात अशोक समर्थ, किरण गायकवाड, सोमनाथ अवघडे उत्कर्ष शिंदे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर मयूर तातुसकर, कुशन जोशी, महेश करवंदे ( निकम), निलेश रमेश चौधरी आणि अमृता धोंगडे निर्माते आहेत. 

हे युद्ध इतिहासातील एक महत्वाचे युद्ध ठरले. कारण या युद्धात भारताच्या विजयी झेंड्याची घोषणा करण्यात आली तसेच बांग्लादेश या नवीन देशाची स्थापनाही झाली. या सगळ्यात बलिदान दिलेल्या शूरवीर सैनिकांची शौर्यगाथा या चित्रपटाच्या माध्य्मातून आपल्या समोर येणार आहे. 

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक प्रकाश जनार्दन पवार म्हणतात, ''या पूर्वीही मी अशाच धाटणीचा चित्रपट केला आहे. त्यामुळे मला अशा रक्त असणाऱ्या कथा विशेष भावतात. हे पडद्यावर साकारणे जरा जड जाते मात्र निर्माते, कलाकार, इतर टीम यांच्या साथीने हा प्रवास सोपा होतो. इतिहासात अनेक लढाया, युद्धे झालीत. परंतु या युद्धामुळे महत्वपूर्ण घटना घडली. अंगावर शहारा आणणारी ही लढाई आतापर्यंतची सर्वात मोठी रक्तरंजित लढाई ठरली.

 या लढाईत पाकिस्तानचे दोन भाग झाले. ही लढाई निश्चितच सोपी नव्हती. भारतीय सैन्यांची हीच शौर्यगाथा पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. या निमित्ताने इतिहास पुन्हा जागवण्याचाही आम्ही प्रयत्न केला आहे. या सगळ्यात मला भूषण मंजुळे यांची कथा, पटकथा लाभल्याने हा चित्रपट प्रेक्षकांना अधिकच वास्तववादी वाटेल.''