किती लुटणार? मुंबई-पुणे टोल नाक्यामुळं अभिनेता-कवी सौमित्रला मनस्ताप, संतापाच्या भरात विचारला जाब

Saumitra Post on Toll : सौमित्र यांनी त्यांना मुंबई-पुणे हायवेवर त्यांना आलेला टोल नाक्याचा एक अनूभव सांगत संताप व्यक्त केला आहे.

Updated: Aug 28, 2023, 10:55 AM IST
किती लुटणार? मुंबई-पुणे टोल नाक्यामुळं अभिनेता-कवी सौमित्रला मनस्ताप, संतापाच्या भरात विचारला जाब title=
(Photo Credit : Social Media)

Saumitra Post on Toll : गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील टोल नाक्यांवरून वाद सुरु झाले आहेत. काही दिवसांपूर्वी मनसे अध्यत्र राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना टोल नाक्यावर अडवल्याने मनसैनिकांनी टोल नाका फोडल्याचे अनेक व्हिडीओ देखील समोर आले होते. त्यानंतर मराठी अभिनेत्री ऋजुता देशमुखने हिने टोलनाक्यावर अधिक टोल कापल्याने व्हिडीओ शेअर करत तक्रार केली होती. आता लोकप्रिय अभिनेते आणि कवी सौमित्र म्हणजे किशोर कदम यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत टोल नाक्यांवर आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या पोस्टनं पुन्हा एकदा टोल नाक्याचा वाद समोर आला आहे. 

किशोर कदम यांनी त्यांच्या फेसबूक अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये किशोर कदम यांनी त्यांना आलेला टोल नाक्याचा अनुभव सांगितला आहे. यावेळी कशा प्रकारे सर्वसामान्य व्यक्तीच्या खिशाला कात्री बसली याविषयी सांगितलं आहे. सौमित्र यांनी त्यांच्या फेसबूक पोस्टमध्ये म्हणाले की 'मुंबईहून पुण्याला जातांना एक्स्प्रेस हायवे वर 240 टोल घेतात... मध्ये मनःशांती वगैर मध्ये काही खायला लोणावळ्यात उतरलं की वर हायवेवर पुन्हा आल्यावर पुन्हा 240 का घेतात ? टोलच्या नावाखाली चाललेली लोकांची ही लूट थांबवण्या बद्दल कुणी बोललं का ? आणि एरवीही प्रवास केल्यावर अधून मधून फास्टटॅग मधून पैसे गेल्याचे मेसेजेस तासा दोनतासांनी येत राहतात ते पैसे कुठे आणि का जातात ? अरे लूट थांबवा रे ही... लोक काहीच बोलत नाहीत म्हणून किती लुटणार आहात ? कुणाकडे तक्रार करायची ? याला जबाबदार अधिकारी कोण आहेत ?' 

सौमित्र यांनी केलेल्या या पोस्टवर अनेकांनी त्यांची प्रतिक्रिया दिली. अनेकांनी त्यांच्या या पोस्टवर कमेंट करत अनेकांनी त्यांना आलेले टोलचे अनुभव सांगितले. तर काही नेटकऱ्यांनी कमेंट करून सांगितलं की कितीही तक्रार केली तरी काही फायदा नाही. त्यातील एक नेटकरी म्हणाला, 'सगळीकडे हेच चित्र आहे. मुंबईतला ऐरोली टोल नाका कशाला आहे ते कळत नाही, तिथला रस्ता किती वर्षे झाली खराबच आहे. खड्डे आणि पुढे टोल नेमकं कशाचा टोल भरायचा खड्ड्याचा का, तेच कळत नाही. रात्री दिवे नसतात तेव्हा तर आणखी वाट लागते.'