भारतातील ७५ टक्के एलईडी बल्ब धोकादायक

एलईडी बल्बपैकी बरीच उत्पादने ही बनावट आणि धोकादायक आहेत, तसेच सर्वाधिक प्रमाण हे राजधानी दिल्लीत आहे.

Updated: Oct 30, 2017, 10:29 PM IST
भारतातील ७५ टक्के एलईडी बल्ब  धोकादायक title=

नवी दिल्ली : भारतातील ७५ टक्के एलईडी बल्ब वापरण्यास धोकादायक असल्याचा दावा, 'नेल्सन' या संशोधन करणाऱ्या कंपनीने केला आहे. भारतात अत्तापर्यंत विक्री झालेले ७५ टक्के एलईडी बल्ब हे सरकारच्या ग्राहक सुरक्षा मानकांच्या अनुरुप नाहीत, असं 'नेल्सन'ने म्हटलं आहे.  

भारतात एलईडी बल्बचा १ बिलियन अमेरिकन डॉलर इतका मोठा व्यवसाय आहे. कंपनीने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. 

एलईडी बल्बपैकी बरीच उत्पादने ही बनावट आणि धोकादायक आहेत, तसेच सर्वाधिक प्रमाण हे राजधानी दिल्लीत आहे, असं या अहवालात म्हटलं आहे.

मुंबई, हैदराबाद, अहमदाबाद आणि नवी दिल्ली यांसारख्या महत्वाच्या शहरांमधील सुमारे २०० इलेक्ट्रिकल रिटेल आऊटलेट्सच्या जुलैमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. 

सरकारच्या 'मेक इन इंडिया'वरही त्याचा विपरित परिणाम होणार असल्याचे या सर्वेक्षणातून दिसून येत आहे. या बनावट आणि नॉन-ब्रॅन्डेड एलईडी बल्बच्या उत्पादनांचा गंभीर परिणाम संघटित बाजारपेठेवर झाला आहे, असे देखील सर्वेक्षणावरून दिसून येतं

दरम्यान, भारतीय मानक ब्युरो  म्हणजेच बीआयएसने ऑगस्ट महिन्यांत एलईडी बल्ब निर्मात्यांना त्यांची उत्पादने बीआयएस सोबत नोंदणी करण्याचे आवाहन केले होते. तसेच यामुळे चिनी एलईडी बल्ब उत्पादनांची तस्करी रोखण्यासही मदत होईल, असे नमूद करण्यात आले होते.