मुंबईत पाणीपुरी विकणारा भारताच्या अंडर-१९ वर्ल्ड कप टीममध्ये

पुढच्या वर्षी होणाऱ्या अंडर-१९ वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमची निवड करण्यात आली आहे.

Updated: Dec 2, 2019, 02:45 PM IST
मुंबईत पाणीपुरी विकणारा भारताच्या अंडर-१९ वर्ल्ड कप टीममध्ये title=

मुंबई : पुढच्या वर्षी होणाऱ्या अंडर-१९ वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमची निवड करण्यात आली आहे. १५ सदस्यांच्या या टीमचं नेतृत्व उत्तर प्रदेशमधल्या मेरठच्या प्रियम गर्गला देण्यात आलं आहे. अंडर-१९ वर्ल्ड कप १९ जानेवारीपासून ७ फेब्रुवारीपर्यंत दक्षिण आफ्रिकेत खेळवला जाणार आहे. अंडर-१९ वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय टीममध्ये मुंबईकर यशस्वी जयस्वालचीही निवड करण्यात आली आहे.

नुकत्याच झालेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळताना यशस्वी जयस्वालने द्विशतक केलं होतं. स्थानिक क्रिकेटमध्ये केलेल्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे यशस्वीची टीम इंडियाच्या अंडर-१९ वर्ल्ड कप टीममध्ये निवड झाली आहे.

मूळच्या उत्तर प्रदेशच्या असलेल्या यशस्वी जयस्वालची कहाणी संघर्षमय आहे. यशस्वीचं क्रिकेटपटू बनण्याचं स्वप्न होतं. भदोहीमध्ये त्याच्या वडिलांचं छोटं दुकान आहे. वडिलांकडे क्रिकेटचं प्रशिक्षण देण्यासाठी पैसे नसल्यामुळे यशस्वी १०-११ वर्षाचा असताना मुंबईत काकाकडे आला. काकाची आर्थिक परिस्थितीही फारशी चांगली नव्हती. अखेर काकांच्या सांगण्यावरून यशस्वीला मुस्लिम युनायटेड क्लबने आपल्या टेंटमध्ये राहण्याची परवानगी दिली. याठिकाणी आणखी काही मुलंही राहत होती.

यशस्वी जयस्वालला वडिल पैसे पाठवत होते, पण त्याला हे पैसे पुरत नव्हते. त्यामुळे त्याने क्रिकेट खेळून उरलेल्या वेळेत काम करायचं ठरवलं. पैसे कमवण्यासाठी यशस्वी पाणी पुरी आणि फळं विकायचा, याच्यातून त्याला थोडेफार पैसे मिळायचे. या पैशातून यशस्वी दिवसाचा खर्च भागवायचा.

काळबादेवी येथील एका डेअरीमध्ये तो रात्री झोपायचा, पण डेअरीमधून त्याला काढून टाकण्यात आलं. 'मी टेंटमध्ये यासाठी गेलो कारण मला डेअरीतून काढून टाकण्यात आलं होतं. संपूर्ण दिवस क्रिकेट खेळ्यानंतर मला आरामाची गरज होती. एक दिवस त्यांनी माझं सामान बाहेर फेकून दिलं. कारण मी त्य़ांची मदत करु शकत नव्हतो', असं यशस्वीने सांगितलं.

तीन वर्ष यशस्वी टेंटमध्ये राहिला. वडील गरज असेल तसे पैसे पाठवत होते. पण यशस्वीला अधिक पैशांची गरज होती म्हणून तो आझाद मैदानमध्ये राम लीला दरम्यान पाणीपुरी आणि फळं विकायचा.

यशस्वीने म्हटलं की, 'रामलीला दरम्यान त्याने चांगले पैसे कमवले. पण माझी अशी इच्छा नव्हती की माझ्या सहकाऱ्यांनी पाणीपुरी खाण्यासाठी माझ्याकडे यावं'. यशस्वीने उपाशी राहूनही दिवस काढले. प्रत्येक दिवशी तो मेणबत्तीच्या प्रकाशात जेवायचा. रात्रीच्या वेळी शौचालयात जायचा. यशस्वी मिडल ऑर्डर बॅट्समन आहे. लोकल कोच ज्वाला सिंह यांनी जेव्हा त्याला पाहिलं आणि त्यांची ओळख झाली तेव्हापासून त्याने अंडर क्रिकेट खेळणं सुरु केलं.

मुंबई अंडर-१९ चे कोच सतीष सामंत यांनी म्हटलं की, 'तो गोलंदाजांचं डोकं वाचतो... आणि त्यानुसार शॉट खेळतो. अंडर-१९ मध्ये लवकरच त्याने आपली जागा पक्की केली. तो असे शॉट्स खेळतो जो इतर कोणीच खेळू शकत नाही. त्याच्याकडे ना स्मार्टफोन ना व्हॉट्सऍप... इतर सगळे मुलं स्मार्टफोन वापरतात. पण, तो येणाऱ्या काळात मुंबईचा खूप मोठा खेळाडू होऊ शकतो.'

अंडर-१९ वर्ल्ड कप टीम

प्रियम गर्ग (कर्णधार), ध्रुव चंद जुरेल (उपकर्णधार, विकेट कीपर), यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, दिव्यांश सक्सेना, शाश्वत रावत, दिव्यांश जोशी, शुभांग हेगडे, रवी बिश्नोई, आकाश सिंग, कार्तिक त्यागी, अथर्व अंकोलकर, कुमार कुशाग्र (विकेट कीपर), सुशांत मिश्रा, विद्याधर पाटील