IPL 2022 Mega Auction: कोण होणार नव्या अहमदाबाद टीमचा कर्णधार?

नव्या अहमदाबाद टीमच्या कर्णधारपदासाठी 5 नावं प्रामुख्याने समोर आहेत.

Updated: Nov 27, 2021, 08:56 AM IST
IPL 2022 Mega Auction: कोण होणार नव्या अहमदाबाद टीमचा कर्णधार? title=

मुंबई :IPL 2022 Mega Auction: कोण होणार नव्या अहमदाबाद टीमचा कर्णधार? आयपीएल 2022 मध्ये फॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे, कारण पुढच्या वर्षी अहमदाबाद आणि लखनऊच्या या दोन नवीन टीम भाग घेणार आहेत. या 2 फ्रँचायझींना एक कोर संघ तयार करायचा आहे. ज्यासाठी त्यांना प्रथम कर्णधाराची निवड करावी लागणार आहे.

दरम्यान आता या दोन टीमच्या कर्णधारपदाची धुरा कोणत्या खेळाडूंना मिळू शकते हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. तर नव्या अहमदाबाद टीमच्या कर्णधारपदासाठी 5 नावं प्रामुख्याने समोर आहेत. चला जाणून घेऊया कोणते 5 खेळाडू आहेत ज्यांना अहमदाबाद टीमचं कर्णधारपद सोपवलं जाऊ शकतं.

केएल राहुल

केएल राहुल पुढील सीझनमध्ये दुसऱ्या टीममध्ये सामील होऊ शकतो. अशा परिस्थितीत अहमदाबाद फ्रँचायझी त्याच्यावर बोली लावू शकते. त्याचा वैयक्तिक रेकॉर्ड उत्कृष्ट आहे आणि त्याचबरोबर तो विकेटकिपिंगची जबाबदारीही पेलू शकतो. मात्र, लखनऊचा संघही त्याच्यावर लक्ष ठेवून आहे.

डेविड वॉर्नर

सनरायझर्स हैदराबादमधून डेव्हिड वॉर्नरचे जाणं निश्चित असून आता कांगारू फलंदाज लिलावात उतरणार असल्याचं त्याने आधीच सांगितलं आहे. अशा स्थितीत अहमदाबाद संघ त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्याचा विचार करू शकतो. वॉर्नरने आतापर्यंत आयपीएलमध्ये 41.59 च्या सरासरीने आणि सुमारे 140 च्या स्ट्राइक रेटने 5449 धावा केल्या आहेत. ज्यात 4 शतकं आणि 50 अर्धशतकांचा समावेश आहे. 

श्रेयस अय्यर

श्रेयस अय्यर पुढील वर्षी दुसऱ्या संघाकडून खेळताना दिसू शकतो कारण त्याला संघाचं नेतृत्व करायचं आहे. कारण दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझी ऋषभ पंतला कर्णधारपदी कायम ठेवण्याच्या विचारात आहे. अशा परिस्थितीत अय्यर लिलावात आला, तर अहमदाबादचा संघ त्याच्यावर बोली लावू शकते. अय्यरने 2020 मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली संघाला प्रथमच आयपीएल फायनलमध्ये नेलं होतं. 

आरोन फिंच

आरोन फिंच हा टी-20 फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आहे. फिंचचा अनुभव पाहता अहमदाबाद फ्रँचायझीची त्याच्यावर नक्कीच नजर असेल. फिंच 2020 मध्ये आरसीबीचा भाग होता. फिंचच्या बळावर अहमदाबाद संघाला विजेतेपद मिळवायचं आहे. फिंचच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया प्रथमच आयसीसी टी-20 वर्ल्डकपचा चॅम्पियन बनला.

हार्दिक पंड्या

मुंबई इंडियन्समधून बाहेर पडल्यानंतर हार्दिक पांड्या अहमदाबाद संघात सामील होऊ शकतो. हार्दिक हा गुजरातच्या वडोदरा शहराचा आहे. हार्दिकला या संघाचा कर्णधार बनवल्यास कोणालाही आश्चर्य वाटणार नाही. हार्दिकने आयपीएलच्या इतिहासात 92 सामने खेळले आहेत ज्यात त्याने 27.33 च्या सरासरीने आणि 153.91 च्या स्ट्राइक रेटने 1476 धावा केल्या आहेत. यादरम्यान हार्दिकने 4 अर्धशतकंही झळकावली आहेत. तर त्याने 31.26 च्या सरासरीने आणि 9.06 च्या इकॉनॉमी रेटने 42 बळी घेतलंय.