Rohit Sharma : आम्ही अपेक्षा केली नव्हती की...; गुजरातविरूद्ध पराभव झाल्यानंतर रोहितचं मोठं विधान!

Rohit Sharma : मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians ) विरूद्ध गुजरात टायटन्स या सामन्यात गुजरातने मुंबई इंडियन्सचा 62 रन्सने पराभव केला. या पराभवासह रोहित सेनेचा प्रवास संपला. या सामन्यानंतर रोहित शर्मा नेमकं काय म्हणाला पाहूयात.  

Updated: May 27, 2023, 04:25 PM IST
Rohit Sharma : आम्ही अपेक्षा केली नव्हती की...; गुजरातविरूद्ध पराभव झाल्यानंतर रोहितचं मोठं विधान! title=

Rohit Sharma : शुक्रवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians ) विरूद्ध गुजरात टायटन्स ( Gujarat Titans ) यांच्यामध्ये दुसरा एलिमिनेटर सामना रंगला होता. या सामन्यात गुजरातने मुंबई इंडियन्सचा 62 रन्सने पराभव केला. मुंबईच्या या पराभवामुळे सहाव्यांदा कप जिंकण्याच्य आशेवर पाणी फेरलं. यंदाच्या आयपीएलमधून ( IPL 2023 ) हार्दिकच्या कंपनीने रोहित सेनेचा प्रवास संपवला. 

गुजरात विरूद्धच्या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सने ( Mumbai Indians ) टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी गुजरातने 20 ओव्हर्समध्ये एकूण 233 रन्स केले. तर प्रत्युत्तरामध्ये मुंबईला केवळ 171 रन्स करणं शक्य झालं आहे. 5 वेळा चॅम्पियन असणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या ( Mumbai Indians ) टीमचा कर्णधार रोहित शर्माने पराभवानंतर काय म्हणाला पाहूयात.  

सामन्याच्या पोस्ट प्रेझेंटेशनमध्ये बोलताना रोहित शर्मा ( Rohit Sharma ) म्हणाला, गुजरातचा स्कोर चांगला असून शुभमन गिलने उत्तम फलंदाजी केली. ज्यावेळी आम्ही फलंदाजीसाठी उतरलो तेव्हा आम्ही फार सकारात्मक होतो. ग्रीन आणि सूर्या यांच्यामध्ये चांगली फलंदाजी करत होते, मात्र त्यांना मोठी खेळी करता आली नाही. 

रोहित शर्मा ( Rohit Sharma ) पुढे म्हणाला की, आम्ही पॉवर प्लेमध्ये काही विकेट्स गमावल्या. यामुळे लक्ष्याचा पाठलाग करताना आम्हाला गती मिळू शकली नाही. आम्हाला एक असा फलंदाज हवा होता, जो शुभमनप्रमाणे अखेरपर्यंत फलंदाजी करेल. मात्र या सामन्यात गुजरातने चांगला खेळ केला. इशानच्या बाबतीत आम्ही अपेक्षा केली नव्हती, त्यामुळे आम्हाला थोडा धक्का बसला, मला नाही माहिती की हे कसं झालं. 

आम्ही जिंकण्यासाठी पुरेसा चांगला खेळ केला नाही. मुळात गेल्या सामन्यात जे घडलं ते लक्षात घेता आमची कामगिरी उत्कृष्ट होती असं मला वाटतंय. शुभमन सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि मला आशा आहे की, यापुढेही त्याची कामगिरी अशीच राहील, असंही रोहित शर्मा ( Rohit Sharma ) म्हणाला. 

मुंबईचं स्वप्न भंगलं

शुभमन गिलच्या (Shubhman Gill) धमाकेदार शतकाच्या जोरावर गुजरातने 20 ओव्हरमध्ये 233 रन्स केले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि नेहाल वढेरा या दोन्ही ओपनर्सना चांगला खेळ दाखवता आला नाही. कॅमरून ग्रीन, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी मुंबईला सांभाळण्याचा प्रयत्न केला. सूर्याने 38 बॉलमध्ये 61 धावा करत मुंबईच्या आशा कायम ठेवल्या होत्या. सूर्या बाद झाल्यानंतर जवळपास गुजरातचा विजय निश्चित झाला. यावेळी मुंबईची संपूर्ण टीम अवघ्या 171 रन्सवर गारद झाली आणि सहाव्यांदा आयपीएल जिंकण्याचं मुंबईचं स्वप्न भंगलं.