संघात निवड न झाल्याने पृथ्वी शॉने सोडलं मौन; म्हणाला, "मी प्रयत्न करतोय तरी..."

मुंबईचा स्फोटक फलंदाज पृथ्वी शॉने याबाबत प्रतिक्रिया देत मौन सोडलं आहे

Updated: Oct 8, 2022, 11:25 AM IST
संघात निवड न झाल्याने पृथ्वी शॉने सोडलं मौन; म्हणाला, "मी प्रयत्न करतोय तरी..." title=

गुरुवारी भारतीय संघ (Team India) रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली आगामी टी-20 विश्वचषक 2022 च्या (T20 world cup 2022) तयारीसाठी ऑस्ट्रेलियात पोहोचला आहे. भारतीय संघ सध्या या स्पर्धेच्या तयारीमध्ये व्यस्त आहे. तर दुसरीकडे शिखर धवनच्या (shikhar dhawan) नेतृत्वाखालील भारतीय युवा खेळाडू दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहेत. या संघात शुभमन गिल, रजत पाटीदार, ऋतुराज गायकवाड आणि राहुल त्रिपाठी असे खेळाडू आहेत. पण संघात सातत्याने चांगली कामगिरी करुन देखील एका खेळाडूला संधी मिळालेली नाही.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून (ind vs sa) दुर्लक्ष झाल्यानंतर  मुंबईचा स्फोटक फलंदाज पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) मौन सोडलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने सांगितले की, मी निराश झालो आहे. मी धावा करतोय, खूप प्रयत्न करत आहे, पण मला संधी मिळत नाही. मात्र, जेव्हा केव्हा, कुठे आणि जेव्हा संधी मिळेल तेव्हा तो दमदार परफॉर्म करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (Prithvi Shaw breaks silence for not selected in the team india)

मिड-डेशी बोलताना शॉ म्हणाला की, "मी निराश झालो. मी धावा करत आहे, खूप प्रयत्न करत आहे, पण मला संधी मिळत नाही. पण हे ठीक आहे. जेव्हा त्यांना (निवडकर्ते) वाटेल की मी तयार आहे, तेव्हा ते मला खेळायला देतील. मला जी काही संधी मिळेल, मग ती भारताच्या 'अ' संघासाठी असो किंवा इतर संघांसाठी असो, मी माझा सर्वोत्तम प्रयत्न करेन आणि माझी फिटनेस पातळी कायम राखेन."

पृर्थ्वी शॉने असे देखील सांगितले की आयपीएल 2022 नंतर त्याने 7 ते 8 किलो वजन कमी केले आहे. यादरम्यान त्याने आपल्या आहाराकडेही खूप लक्ष दिले आहे.

शॉ पुढे म्हणाला की, "मी माझ्या फलंदाजीच्या गोष्टींवर काम केले नाही, पण फिटनेसवर खूप काम केले. मी गेल्या आयपीएलनंतर वजन कमी करण्यावर काम केले आणि सात ते आठ किलो वजन कमी केले. मी जीममध्ये बराच वेळ घालवतो. खूप धावतोय. मिठाई आणि कोल्ड्रिंक खाणे बंद केले आहे. चायनीज फूड आता माझ्या मेनूमधून पूर्णपणे बाहेर आहे."