भारत-बांग्लादेश दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये रोहित शर्माने घेतला मोठा निर्णय, 60 वर्षात पहिल्यांदाच असं घडलं

IND VS BAN 2nd Test : अनेक वर्षांनी कानपूर येथे टीम इंडियाचा टेस्ट सामना खेळवला जात असून यात सामन्याच्या सुरुवातीला कर्णधार रोहित शर्माने घेतलेला निर्णय ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले. 

पुजा पवार | Updated: Sep 27, 2024, 01:01 PM IST
भारत-बांग्लादेश दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये रोहित शर्माने घेतला मोठा निर्णय, 60 वर्षात पहिल्यांदाच असं घडलं  title=
(Photo Credit : Social Media)

IND VS BAN 2nd Test Latest Updates in Marathi : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून यातील दुसरा टेस्ट सामना हा 27 सप्टेंबर पासून कानपुर येथे खेळवला जात आहे. यापूर्वी टीम इंडियाने पहिल्या टेस्ट सामन्यात बांगलादेशला धूळ चारून 280 धावांनी विजय मिळवला होता. अनेक वर्षांनी कानपूर येथे टीम इंडियाचा टेस्ट सामना खेळवला जात असून यात सामन्याच्या सुरुवातीला कर्णधार रोहित शर्माने घेतलेला निर्णय ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले. 

कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या टेस्ट सामन्याला शुक्रवार पासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी दोन्ही टीममध्ये झालेला टॉस भारताचा कर्णधार रोहित शर्माने जिंकला, यावेळी त्याने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र रोहितच्या या निर्णयाने सर्वच आश्चर्यचकित झाले. याच कारण म्हणजे 1964 रोजी भारत इंग्लंड यांच्यात ग्रीन पार्कवर खेळवण्यात आलेल्या टेस्ट सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतर एकदाही ग्रीन पार्कवर खेळवण्यात आलेल्या टेस्ट सामन्यात भारताने टॉस जिंकून गोलंदाजी निवडली नव्हती. 

रोहितने का घेतला गोलंदाजीचा निर्णय?

रोहित शर्मा आणि बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतो याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रोहितच्या या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्य वाटलं असलं तरी कानपुर येथील सामन्यावर पावसाचं सावट पाहून रोहितने हा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या टेस्ट सामन्यापूर्वी स्टेडियम परिसरात पाऊस पडला होता. तसेच सामन्याच्या सुरुवातीच्या तीनही दिवशी हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे. हे पाहून रोहितने पहिले फलंदाजी न निवडता गोलंदाजी निवडली. तब्बल ९ वर्षांनी भारताने भारतात टेस्ट सामन्याचा टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. कानपूरच्या मैदानावर भारताने आतापर्यंत  23 टेस्ट सामने खेळले असून यापैकी ७ सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीमने जिंकले आहेत, तर ३ सामने हे गोलंदाजी करणाऱ्या टीमने जिंकले. उर्वरित १३ सामने हे ड्रॉ झाले. 

भारताच्या प्लेईंग 11 मध्ये कोणाला संधी? 

कर्णधार रोहित शर्मा कानपूर टेस्टसाठी टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये बदल करेल अशी अपेक्षा होती, मात्र तसे झाले नाही. रोहितने प्लेईंग 11 मध्ये कोणतेही बदल न केल्याने अनुभवी स्पिनर कुलदीप यादवला बेंचवरच बसावे लागणार आहे. 

भारताची प्लेईंग 11 : यशस्वी जयसवाल, रोहित शर्मा (कर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएल राहुल, रवींद्र जड़ेजा, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रित बुमरा, मोहम्मद सिराज

बांगलादेशची प्लेईंग 11 : शादमान इस्लाम, जाकिर हसन, नजमुल हुसैन शान्तो (कर्णधार ), मोमिनुल हक, मुश्फिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिट्टन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, हसन महमूद, खालिद अहमद