पैशासाठी मैत्रीचा खून

पैशाच्या हव्यासापोटी महाविद्यालयीन तरुणांनी मित्राचं अपहरण करुन खून केल्याची घटना ठाण्यातल्या काशिमिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. हत्या झालेल्या तरुणाचं नाव गणेश श्रीराम असं आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 16, 2012, 12:21 PM IST

www.24taas.com, ठाणे
पैशाच्या हव्यासापोटी महाविद्यालयीन तरुणांनी मित्राचं अपहरण करुन खून केल्याची घटना ठाण्यातल्या काशिमिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. हत्या झालेल्या तरुणाचं नाव गणेश श्रीराम असं आहे.
मूळचा तारापूरचा रहिवासी असलेला हा तरुण कांदिवलीच्या ठाकूर कॉलेजमध्ये शिकत होता. काशिमीरा भागातल्या एका इमारतीत तो भाड्यानं राहत होता. झटपट पैसा कमावण्याच्या उद्देशानं गणेशचे मित्र रविंद्र य़ादव आणि कल्पेश सरोज यांनी गणेशच्या अपहरणाचा कट रचला. गणेशला नायगावला बोलावून त्याची दगडानं ठेचून हत्या केली. हत्येनंतर गणेशचा मृतदेह खाडीकिना-यावरील झुडपात फेकून देण्यात आला.
त्यानंतर गणेशच्या वडिलांना आठ लाखांच्या खंडणीसाठी फोन केला. याबाबत गणेशचे वडील रामचंद्र यांनी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी शिताफीनं सापळा लावून दोघांनाही अटक केली. मात्र या दोघांनाही गणेशची पूर्वीच हत्या केल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांनी गणेशचा मृतदेह ताब्यात घेतलं.