चिल्लर आरोपांना महत्व देत नाही- गडकरी

अरविंद केजरीवाल यांनी भाजप अध्यक्ष नितीन गडकरींवर केलेल्या गंभीर आरोपांना नितीन गडकरी यांनी ताबडतोब प्रत्युत्तर दिलं आहे. आपण अशा चिल्लर आरोपांना महत्व देत नाही असं सांगत नितीन गडकरी यांनी आपल्यावरील आरोप झटकायचा प्रयत्न केला आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 17, 2012, 07:51 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
अरविंद केजरीवाल यांनी भाजप अध्यक्ष नितीन गडकरींवर केलेल्या गंभीर आरोपांना नितीन गडकरी यांनी ताबडतोब प्रत्युत्तर दिलं आहे. आपण अशा चिल्लर आरोपांना महत्व देत नाही असं सांगत नितीन गडकरी यांनी आपल्यावरील आरोप झटकायचा प्रयत्न केला आहे.
टीम केजरीवाल यांचे आरोप म्हणजे भाजपाला बदनाम करण्याचं षडयंत्र असल्याचं गडकरी म्हणाले आहेत. केजरीवाल हे नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या बेतात असल्याने या पक्षाच्या प्रसिद्धीसाठी त्यांचा हा खटाटोप चालला असल्याची टीका गडकरींनी केली आहे. टीम केजरीवाल राजकारणात विरोधकांची जागा घेण्याचा प्रयत्न करत आसल्याचा दावाही गडकरींनी केला आहे.
मी मिळवलेली जमीन नियमानुसार मिळवली असून शेतकरी आणि मजुरांच्या हितासाठीच मी काम करत असल्याचं गडकरी म्हणाले. सिंचन घोटाळ्याबद्दल बोलताना गडकरींनी स्पष्ट केलं, की भाजपानेच सिंचन घोटाळा बाहेर काढला होता.
इतर भाजप नेत्यांनी नितीन गडकरींवर केलेले आरोप पूर्णपणे फेटाळले आहेत. अंजली दमानियांच्या साथीनं केजरीवाल त्यांची विश्वासहर्तता गमावत असल्याचा दावा विनोद तावडे यांनी झी २४ तासकडे केला.