राज ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यात घडतंय काय?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आलेत.. शहर विकासाला चालना देण्यासाठी आज सकाळपासून अधिकारी आणि पदाधिका-यांच्या बैठका राज घेत आहेत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 3, 2013, 06:35 PM IST

www.24taas.com, नाशिक
मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आलेत.. शहर विकासाला चालना देण्यासाठी आज सकाळपासून अधिकारी आणि पदाधिका-यांच्या बैठका राज घेत आहेत. मात्र या बैठकांमधून त्यांनी माध्यमांना दूर ठेवलंय. सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून नागरिकांच्या अपेक्षा कधी पूर्ण होणार असे सवाल प्रसिद्धी माध्यमांमधून उपस्थित केले जात असल्यानं राज यांनी नाराजी व्यक्त करत केवळ औपचारिक गप्पांवर माध्यमांची बोळवण केली.
नाशिक महापालिकेतील सत्ताधारी पक्षाचे सर्वेसर्वा राज ठाकरे उत्तर महारष्ट्र दौऱ्यावर आहेत. सात एप्रिलला जळगावात सभा घेण्याआधी दोन दिवस राज ठाकरे नाशिक मुक्कामी आहेत. सहा महिन्यापूर्वी महापालिका आयुक्त आणि अधिकाऱ्यांची बैठक भेट घेतल्यानंतर आज पुन्हा राज यांनी शहर विकासासंदर्भात अधिकाऱ्यांची भेट घेतली. नाशिक महापालिकेतील अंतर्गत रस्त्यांची काम तातडीन मार्गी लावण्याच्या सूचना राज यांनी अधिकाऱ्यांना केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. शहरातील मुख्य रस्त्यांची आणि मुख्य चौक प्रसस्त वाटतील अशा दर्जेदार पद्धतीन करावीत, त्याचबरोबर गोदावरी प्रदूषण आणि गोदाघाट विस्तारीकरणाचा मुद्दा राज यांच्या रडारवर होता. महापालीला आयुक्तांसह खातेप्रमुख आणि मनसेचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. त्यानंतर सत्तेतील मित्रपक्ष असणाऱ्या भाजपच्या नेत्यांबारोबारही राज यांनी एक तास चर्चा केली. यातही शहरातील विकासाचं मुद्दा अजेंड्यावर ठेवत कुंभमेळासाठी जास्तीत जास्त निधी आणि कामं लवकर सूर करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याच आश्वासन त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यान दिलं.
अधिकारी, पदाधिकारी, इतर राजकीय पक्षांचे स्थानिक नेते आणि शिष्ठ मंडळाशी चर्चा करणाऱ्या राज यांनी प्रसार माध्यमांशीही ‘ऑफ दी रेकॉर्ड’ औपचारिक गप्पा मारण पसंत केलं. त्याला कारण माध्यमांवरील राज यांची नाराजी होती. गेल्या वर्षभरात सत्ताधारी पक्षाच्या कामकाजाचा मूल्यमापन केलं जात असल्यानं राज नाराज असून जोपर्यंत शहरात विकास दिसणार नाही तो पर्यंत बोलण्यात अर्थ नाही अस सांगत माध्यमांशी बोलण राज यांनी टाळलं. मात्र राज यांच्या या भूमिकेविषयी नाशिककरांनी खेद व्यक्त केला. नाशिककरांनी इतरांना डावलून सत्ता दिल्यानं त्यांच्याकडून अपेक्षा जास्त असल्याची भावना व्यक्त होतेय.

राज ठाकरे काल दुपारी ४ वाजता नाशकात येणार असा निरोप मुंबईहून आला होता. त्या प्रमाणे महापौअरांसह शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी इतर कामांना फाटा देवून साहेबांच्या स्वागतासाठी मुंबई नाक्यावर तळ ठोकून होते. मात्र तब्बल साडेचार तासानी म्हणजे साडेआठ, नऊ वाजता साहेबांच दर्शन झालं. उशिरा का असेना पण साहेब आलेत हे समाधान पदाधिकाऱ्याच्या चेहऱ्यावर होत. असच समाधान नाशिककरांच्या चेहऱ्यावर उशिरा तरी दिसेल का असा प्रश्न नाशिकर विचारत आहेत.