मुंबई महापौर निवडणुकीतून भाजपने माघार का घेतली?

 भाजपने महापौर आणि सर्वच विषय समितीतून माघार घेतली. त्यामुळे भाजपने अचानक असा निर्णय का घेतला याची चर्चा आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 4, 2017, 09:43 PM IST
मुंबई महापौर निवडणुकीतून भाजपने माघार का घेतली? title=

मुंबई : भाजपने महापौर आणि सर्वच विषय समितीतून माघार घेतली. त्यामुळे भाजपने अचानक असा निर्णय का घेतला याची चर्चा आहे.

पालिका निवडणूक पारदर्शकतेच्या मुद्द्यावर लढविली गेली. भाजपने हा मुद्दा प्रतिष्ठेचा केला. त्याचे फळ त्यांना 31 वरुन 82 नगरसेवकांच्या माध्यमातून मिळाले. मात्र, भाजपने आधीपासून मुंबईत आपलाच महापौर बसणार असा थेट दावा केला होता. त्यामुळे दोन जास्त मिळालेल्या शिवसेना की भाजपचा महापौर याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मात्र, आज भाजपने महापौर आणि सर्वच विषय समितीतून माघार घेतली. त्यामुळे भाजपने अचानक असा निर्णय का घेतला याची चर्चा आहे.

राज्यात भाजपने चांगले यश मिळविले. राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून नावारुपाला आला. त्यामुळे भाजपची चर्चा अधिक होत आहे. मात्र, शिवसेनेने आक्रमक होत भाजपवर सातत्याने टीका केली आणि युती तोडल्याची घोषणाही केली. त्यामुळे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात लढले. यापुढेही भाजपबरोबर जाणार नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर करुन टाकले. त्यामुळे मु्ंबईत त्रिशंकु परिस्थिती असताना पालिकेत युती होणार की नाही, अशी चर्चा होती. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी युतीशिवाय पर्याय नाही, असे जाहीरपणे बोलून दाखविले. मात्र, शिवसेनेने याकडे दुर्लक्ष करत आमचाच महापौर बसणार असे सांगत युतीबाबत बोलण्यात नकार दिला. त्यामुळे शिवसेनेकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने भाजपची अडचणी अधिक वाढली.

दरम्यान, पारदर्शकतेसाठी राज्य मंत्रीमंडळात एक समिती नेमणूक करुन त्यात सर्वच प्रतिनिधींना स्थान द्यावा. यात पत्रकार, विरोधी पक्षातील सदस्य असावा, असाही आग्रह शिवसेनेन धरला आहे. मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार घालण्याचा शिवसेनेचा निर्णय, तसेच पुढील आठवड्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे आणि भाजपला शिवसेनेचा सत्तेत पाठिंबा आहे. त्यामुळे भविष्यात कोणताही धोका नको, राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला शिवसेनेची गरज लागणार आहे. तर दुसरीकडे पालिकेत महापौर निवडणुकीसाठी संख्याबळ कसे जमवायची अशी चिंताही होती. त्यामुळे टिकूवर सत्ता कशी टिकवायची हाही प्रश्न होता, या सगळ्यांचा विचार करुन असा निर्णय घेतल्याची शक्यता आहे.

ही आहेत काही कारणे :

- मुंबईत संख्याबळ कमी होते.
- आता तोडफोड करून सत्ता मिळवली असती तर भविष्यात अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं असतं.
- निवडणुकीमुळे शिवसेना जास्त दु्खावला गेला असता त्याचा परिणाम अधिवेशन आणि सरकारवर झाला असता  
- ८ जिल्हा परिषदांमध्ये शिवसेनेला बरोबर घेतल्याशिवाय सत्ता स्थापन करणे अवघड आहे.
- एकट्या मुंबईसाठी या आठ जिल्हा परिषदांमंधली सत्ता गमवायची का असा मुद्दा त्या-त्या जिल्ह्यातील मंत्र्यांनी लावून धरला होता
- सरकार चालवताना जास्त डोकेदुखी नको हाही भाजपाचा विचार.
- शिवाय युतीसाठी भाजपने केलेल्या प्रयत्नांना शिवसेनेने कानाडोळा करत दुर्लक्ष केले

- निवडणूक लढवून पराभव झाला असता तर नाचक्की झाली असती