भाजपचे आश्वासन खोटे, सत्तेत असूनही औरंगाबादकरांचे मेगाहाल!

औरंगाबाद महापालिकेत भाजपचाच महापौर आहे. राज्यातही त्यांचीच सत्ता आहे. तरी सुद्धा औरंगाबादकरांची कधी वीज बंद होतेय तर कधी पाणी, आता 24 तासांच औरंगाबादकरांचे पाणी बंद करण्यात येणार आहे. 

Updated: Feb 9, 2017, 05:32 PM IST
भाजपचे आश्वासन खोटे, सत्तेत असूनही औरंगाबादकरांचे मेगाहाल! title=

विशाल करोळे, औरंगाबाद : विकासासाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत एकाच पक्षाची सत्ता असल्यास अडचण येत नाही, असे भाजप नेते रोजच प्रचारामधून सांगत आहेत. औरंगाबाद महापालिकेत भाजपचाच महापौर आहे. राज्यातही त्यांचीच सत्ता आहे. तरी सुद्धा औरंगाबादकरांची कधी वीज बंद होतेय तर कधी पाणी, आता 24 तासांच औरंगाबादकरांचे पाणी बंद करण्यात येणार आहे. 

दोनच दिवसांपूर्वी औरंगाबाद शहराचे रस्ते असे अंधारात हरवले होते. वीज बिल न भरल्यानं महावितरणकंपनीनं शहरातील पथदिव्याची वीज कापली होती आणि तीन दिवस शहर अंधारात होते. अखेर कसाबसा यावर तोडगा निघत नाही तोच आता औरंगाबादकरांचे पाणी तोडण्याची नोटीस महावितरणनं बजावली आहे, पाणीपुरवठ्याचे 32 कोटी महापालिकेकडे थकबाकी आहे, ही थकबाकी 24 तासांत भरणा करा अशी नोटीस महावितरणने महापालिकेला पाठवली आहे.

नाहीतर जायकवाडीपासून औरंगाबाद शहरापर्यंत असणा-या पाईपलाईनचा वीज पुरवठा तोडण्याचा इशाराच महावितरणनं दिला आहे, महापालिकेनं महावितरणच्या शहरातील डीपींना कर आकारल्यानं सूड भावनेतून महावितरण वागत असल्याचं आरोप महापौरांनी केला आहे.

आता भाजपच्या महापौरांचा वीजवितरण कंपनीवरचा आरोप धक्कादायकच म्हणावे लागेल त्यात एकाच आठवड्यात दोन वेळा महावितरण कंपनीनं महापालिकेला अडचणीत आणले आहे. फक्त थकबाकीमुळं नागरिकांची वीज आणि पाणी तुटण्याची वेळ महापालिकेनं आणली आहे, आथा अखेर भाजपच्या महापौरांनी भाजपच्या मंत्र्यांनाच साद घातली आहे असे काही होणार नाही अस सांगून वेळ मारून नेण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु आहे.
 
शहरातील मालमत्ता कराची थकबाकी भरा अशी तंबी महापालिकेने दिल्यानं महावितरणनेही आधी आमची थकबाकी भरा अशी भूमिका घेऊन वीज पुरवठा खंडीत करणे सुरु केल्यानं शहरातील नागरिक मात्र अडचणींचा सामना करत आहे. सरकारच्या या दोन्ही आस्थापना असे दूश्मनी सारखे वागत असल्यानं शहरातीस सुविधांचा खेळखंडोबा होत चालला आहे. त्यामुळे आता राज्य सरकारनं किमान याकडं लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.