Year Ender 2015 : वाद 'असहिष्णुते'चा!

उत्तरप्रदेशात ५० वर्षीय मोहम्मद अखलाख याची जवळपास २०० जणांच्या जमावाकडून क्रूर हत्या करण्यात आली तर या घटनेत अखलाखचा २२ वर्षीय मुलगा दानिश गंभीररित्या जखमी झाला. उल्लेखनीय म्हणजे, अखलाखच्या घरी गोमांश असल्याच्या 'संशयावरून' ही हत्या झाली होती. परंतु, चौकशीनंतर अखलाखच्या घरी सापडलेलं मांस म्हणजे गोमांस नव्हतं तर ते मटण होतं, हे उघड झालं. उत्तरप्रदेशात गोहत्येला बंदी आहे.

Updated: Dec 17, 2015, 05:51 PM IST
Year Ender  2015 : वाद 'असहिष्णुते'चा! title=

मुंबई : उत्तरप्रदेशात ५० वर्षीय मोहम्मद अखलाख याची जवळपास २०० जणांच्या जमावाकडून क्रूर हत्या करण्यात आली तर या घटनेत अखलाखचा २२ वर्षीय मुलगा दानिश गंभीररित्या जखमी झाला. उल्लेखनीय म्हणजे, अखलाखच्या घरी गोमांश असल्याच्या 'संशयावरून' ही हत्या झाली होती. परंतु, चौकशीनंतर अखलाखच्या घरी सापडलेलं मांस म्हणजे गोमांस नव्हतं तर ते मटण होतं, हे उघड झालं. उत्तरप्रदेशात गोहत्येला बंदी आहे.
http://zeenews.india.com/marathi/news/india/dadri-murder-meat-in-akhlaq-...

राजकीय वर्तुळात घमासान
अखलाखच्या हत्येनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. हिवाळी अधिवेशनात, गृह मंत्रालयाकडून या घटनेची चौकशी झाली नाही, त्यामुळे राज्य सरकारनं या घटनेचा अहवाल मागितला आहे.

कुटुंबीयांची माघार

दुसरीकडे, अखलाखच्या कुटुंबीयांनी मात्र माघार घेत हे प्रकरण आपल्याला आणखी वाढवायचं नसल्याचं सांगितलं. ६ डिसेंबर रोजी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची भेट घेत आपण झाल्या प्रकरणाच्या चौकशीबद्दल समाधानी असल्याचं अखलाखच्या कुटुंबीयांनी म्हटलं. राज्य सरकारकडून या कुटुंबाला ४५ लाख रुपयांची मदत दिली गेली.

अवॉर्ड वापसी सत्र

दादरी हत्याकांडानंतर मात्र अनेक चर्चित लेखक, सिनेनिर्माते इतकंच काय तर वैज्ञानिकांनीही आपापले अवॉर्ड परत देण्याचं एक सत्र सुरू केलं. भारतातल्या वाढत्या असहिष्णुतेचा धिक्कार करत त्यांनी हा निर्णय घेतल्याचं त्यांचं म्हणणं होतं. कन्नड विचारवंत कलबुर्गी, गोविंद पानसरे यांच्या हत्येचाही त्यांनी आवर्जुन उल्लेख केला. बुद्धिजीवी वर्गातील जवळपास ७५ जणांनी अवॉर्ड परत केले. 

केंद्राला अवॉर्ड वापसीचं 'कारण'चं कळेना

अवॉर्ड वापसीवर प्रतिक्रिया देताना राजनाथ सिंग यांनी मात्र या अवॉर्ड वापसीमागचं कारणचं आपल्याला न कळल्याची प्रतिक्रिया दिली. केंद्रीय गृहमंत्री म्हणून आपल्याला यामागचं कारण कळायला हवं, असंही त्यांनी म्हटलं... तसंच भारतात जर 'असहिष्णुता' आहे तर ती कुठंय? आणि असेलच तर ती नाहिशी करण्यासाठी काय करायला हवं? असंही त्यांनी म्हटलं. 

'अवॉर्ड वापसी ही राजकीय खेळी' 

१४ ऑक्टोबर रोजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अवॉर्ड वापसी ही राजकीय खेळी असल्याचं म्हटलं. मोदी सरकारला बदनाम करण्यासाठी साहित्य अकादमी अवॉर्ड परत केले जातायत, असं त्यांनी म्हटलं.

कुठेय असहिष्णुता? - केंद्र सरकार

असहिष्णुतेचा मुद्दा तापतोय हे लक्षात आल्यानंतर केंद्र सरकारनं 'भारतात असहिष्णुता वाढत नाहीय. काही प्रमाणात असहिष्णुता समाजात आहे परंतु ती तर एनडीए सरकार सत्तेत येण्यापूर्वीही होती. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि बीएसपी यामुद्द्याचं अल्पसंख्यांक आणि दलितांचं राजकारण करत आहे' असं हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकारनं म्हटलं. 

विरोध म्हणजे देशद्रोह - राहुल गांधी

काँग्रेस उपाध्यक्ष आणि अमेठीचे खासदार राहुल गांधी यांनी संसदेत असहिष्णुतेवर भाष्य केलं. यावेळी, त्यांनी 'विरोध करणं म्हणजे आता देशद्रोह' झाल्याचं म्हटलं.

पंतप्रधान मोदींची विरोधकांप्रती मवाळ भूमिका

केवळ संसदेत सत्ताधाऱ्यांची संख्या म्हणून विरोधकांवर निर्णय लादले जाणार नाहीत... सर्वांची मतं लक्षात घेऊनच सरकार निर्णय घेईल, असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी संसदेत विरोधकांप्रती मवाळ भूमिका घेतली. 'इंडिया फर्स्ट' हाच भारताचा धर्म आणि राज्यघटना हाच एकमेव 'धर्मग्रंथ' आहे, असं यावेळी पंतप्रधान मोदी यांनी स्पष्टपणे म्हटलंय. 

आमिरची अहिसहिष्णुतेच्या वादात उडी

२३ नोव्हेंबर रोजी बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानही नकळतपणे असहिष्णुतेच्या वादात ओढला गेला. भारतातली असहिष्णुतेमुळे आपल्या पत्नी किरण हिनं आपल्याला दुसऱ्या देशात स्थायिक होण्याचा सल्ला दिला होता, असं आमिरनं एका कार्यक्रमात म्हटलं... आणि एकच गहजब उडाला. 

'असहिष्णुतेचा वाद हा राजकीय मुद्दा'

६ डिसेंबर रोजी भारताचे मुख्य न्यायाधिकारी टी एस ठाकूर यांनी मात्र 'असहिष्णुता' हा केवळ राजकीय मुद्दा असल्याचं म्हटलं... सोबतच, जोपर्यंत भारताची न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे तोपर्यंत कोणत्याही नागरिकाला कशालाही घाबरण्याची किंवा काळजी करण्याची गरज नाही, असं त्यांनी म्हटलं.