दहशतवादी चकमकीत भारतीय जवान शहीद, भारताकडून प्रत्युत्तर

जम्मू काश्मीरमधील केरन सेक्टर इथं दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत भारताचा एक जवान शहीद झाला आहे. तर पाकिस्ताननंही सलग दुसऱ्या दिवशी सीमा रेषेवरील २५ भारतीय चौक्यांसह १९ गावांवर गोळीबार केला आहे. 

IANS | Updated: Aug 24, 2014, 03:38 PM IST
दहशतवादी चकमकीत भारतीय जवान शहीद, भारताकडून प्रत्युत्तर title=

कुपवाडा, जम्मू: जम्मू काश्मीरमधील केरन सेक्टर इथं दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत भारताचा एक जवान शहीद झाला आहे. तर पाकिस्ताननंही सलग दुसऱ्या दिवशी सीमा रेषेवरील २५ भारतीय चौक्यांसह १९ गावांवर गोळीबार केला आहे. 

केरन सेक्टरमध्ये दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानमधून काही दहशतवाद्यांनी भारतात घुसखोरी केली होती. सुमारे ६ ते ८ दहशतवादी कारारुसच्या दिशेनं जात असताना पेट्रोलिंग करणाऱ्या भारतीय जवानांना या दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं. रविवारी सकाळी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद झाला. या घटनेनंतर केरन सेक्टरमध्ये सुरक्षा दलाचे जवान रवाना झाले असून दहशतवाद्यांसोबत अजूनही चकमक सुरु असल्याचं समजतंय. याच भागात दोन दिवसांपूर्वी सैन्यानं दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं होतं. 

दरम्यान, पाकिस्तान सलग दुसऱ्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन करत सीमारेषेवरील भारतीय चौक्या आणि गावांवर हल्ला केला. शनिवारी रात्रीपासून पाक सैन्यानं जम्मूतील आर एस पुरा आणि अरनिया सेक्टर इथं गोळीबार केला. आज सकाळी साडे सातपर्यंत पाककडून गोळीबार सुरु होता. भारताच्या सीमा सुरक्षा दलानं (बीएसएफ) पाकला चोख प्रत्युत्तर दिलं. 

पाकनं स्वयंचलित बंदूक आणि मोर्टार बाँबचा या हल्ल्यात वापर केल्याचं बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. सीमा रेषेवरील स्थितीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत चर्चा केली. गृहमंत्रींनी दिल्ली सोडून जाऊ नये, असे मोदींनी सांगितल्यावर राजनाथ सिंह यांनी दिल्लीवगळता अन्य राज्यांमधील सर्व दौरे रद्द केले आहेत. राजनाथ सिंह यांनी बीएसएफच्या महासंचालकांसोबतही चर्चा केली असून पाकला चोख प्रत्युत्तर देण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी बीएसएफच्या महासंचालकांना दिले आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.