शेतकरी मागतोय सरकारकडे आत्महत्येची परवानगी

राज्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. गावात पाणी नसलं तरी या दुष्काळानं मात्र मराठवाड्यातल्या शेतक-यांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 8, 2013, 08:57 PM IST

विशाल करोळे, www.24taas.com, औरंगाबाद
राज्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. गावात पाणी नसलं तरी या दुष्काळानं मात्र मराठवाड्यातल्या शेतक-यांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. दुष्काळासाठी सरकारी मदत जाहीर झाली खरी, मात्र ती काही शेतकऱ्यांपर्यंत पोहचली नाही. त्यामुळं शेतक-यांचं जगणं असह्य झालं. त्यामुळे औरंगाबादमधील एका शेतकऱ्याने सरकारकडे आत्महत्येची परवानगी मागितली आहे.
मा. तहसीलदारसाहेब,
मी सांडू जाधव, मुक्काम पोस्ट घोडेगाव, तालुका खुलताबाद, जिल्हा औरंगाबाद येथील रहिवासी असून पाणी नसल्यानं 10 एकरांवरचा ऊस आणि 5 एकरांवरची मोसंबी वाळून गेलीय. गोठ्यात 36 जनावरं आहेत, त्यांना खायला चारा नाही, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलीय. सरकारनं पंचनामा करून तातडीनं मदत करावी किंवा आत्महत्या करायला परवानगी द्यावी.

मराठवाड्यात दुष्काळानं बळीराजाची वाईट अवस्था केली आहे. यंदा शेतक-यांवर पाऊस असा काही रुसला, की शेतकरी पुरता हतबल झाला... थेंब थेंब पाण्यासाठी त्याला वणवण करावी लागत आहे. शेतातली पिकं करपली, जनावरं तहानलेली.. जिथं माणसांनाच प्यायला पाणी नाही, तिथं जनावरं जगयावची कशी असा प्रश्न औरंगाबादच्या खुल्ताबाद तालुक्यातल्या सांडू जाधव यांना पडला. 15 एकर शेती, 8 विहिरी, 22 गायी, 6 बैल आणि 8 म्हशी.. दिसायला सधन शेतकरी.. मात्र या दुष्काळनं रावाचाही रंक केलाय. इथले आमदारही सरकारी धोरणापुढं हतबल झाले आहेत.

यंदाच्या दुष्काळानं पिढ्यान पिढ्या उध्वस्त करण्यास सुरुवात केलीय.. सरकारी मदत कागदावर जाहीर झाली खरी पण ती अजूनही पोहचलीच नाही.. अधिकारी सरकारकडं बोट दाखवतायत... मात्र यात भरडला जातोय तो मात्र सामान्य शेतकरी..