भूजल पातळी खालावल्यानं वसई-विरारमध्ये पाणी प्रश्न पेटला, ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा

दरवर्षी प्रमाणाने यंदाही वसई-विरार महापालिकेमध्ये नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचला सामोरे जावं लागतंय. सूर्या पाणी प्रकल्पानंतही वसई विरारकरांना जलदिलासा मिळालेला नाही. 

नेहा चौधरी | Updated: Mar 22, 2024, 08:39 AM IST
भूजल पातळी खालावल्यानं वसई-विरारमध्ये पाणी प्रश्न पेटला, ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा title=
Water crisis flared up in Vasai Virar due to decrease in ground water level water shortage in summer

वसई विरारमधील नागरिकांना पाणीटंचाईचा वर्षांवर्ष सामना करावा लागतोय. म्हणून सूर्या धरण प्रकल्पातून वसई विरारकरांची जलसमस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. मात्र या प्रकल्पानंतरही उन्हाळा सुरु होण्यापूर्वीच वसई विरारकरांना पाणीटंचाईच्या झळा बसायला सुरुवात झाली आहे. पाण्यासाठी नागरिकांना टँकरवर अवलंबून राहवं लागतंय. विरार पूर्व भागातील लोकांना गेल्या महिन्याभरापासून पाणीटंचाईला सामोरे जावं लागतंय. या भाघात पालिकेकडून दररोज 23 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. (Water crisis flared up in Vasai Virar due to decrease in ground water level water shortage in summer)

वसई विरारमधील पाणी प्रश्न मिटविण्यासाठी एमएमआरडीएचं सूर्या प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. मात्र तरीही वसई विरारकरांवरील पाणीटंचाईचं संकट पाठ सोडत नाही आहे. या प्रकल्पात अतिरिक्त पाणी असलं तरी पूर्वेच्या काही भागांमध्ये पालिकेच्या जलवाहिन्या पोहोचल्या नसल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे. 

पूर्व भागातील नागरिक बोअरवेल, विहिरी, तलावांतील पाण्यावर आपली तहान भागवताना दिसत आहेत. वसई विरारमधील लोकसंख्या गेल्या काही वर्षांपासून झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पाण्याची मागणीही तेवढ्याच झपाट्याने वाढ आहे. या स्थितीत पाण्याची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. काही वर्षांपूर्वी पनलिका, विहिरी, तलाव अशा नैसर्गिक जलस्रोतांत पाणी सहज मिळतं होतं. पण अनिर्बंध पाणी उपसा, सिमेंटकाँक्रीटकरणचं जाळ यामुळे या शहरातील भूजल पातळी खालावली आहे. दिवसेंदिवस पाणीसाठा कमी होत आहे. त्यामुळे वसई विरारकरांवरील पाणी संकट भर उन्हाळ्यात अजून तीव्र होताना दिसत आहे. 

उन्हाळ्यात ही परिस्थिती अजून बिकट होते. कारण जलस्त्रोतांची पातळी खालावते आणि नागरिकांना पालिकेच्या पाणी टँकरवर अवलंबून राहावं लागतं. पाणी टंचाईची भीषण समस्या ही कामण, चिंचोटी, कोल्ही, देवदल, सागपाडा, गिदराई पाडा, सातिवली, गोखिवरे, वैतरणा परिसर अधिक जाणवते. कामण परिसरातील गावपाड्यांना टँकरद्वारे पाणी द्यावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते दिनेश म्हात्रे आणि माजी नगरसेविका प्रीती म्हात्रे यांनी हे लढा देत आहेत. सध्या पालिकेकडून वसई-विरारमधील प्रभाग समिती जीमधील कामण परिसर, प्रभाग समिती एफमधील पेल्हार आणि सीमधील वैतरणा या परिसरात दररोज 23 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे, अशी माहिती वसई विरार महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातून देण्यात आली आहे.