"विचारांचे वारसदार असं सांगावं लागतं हेच दुर्दैव" ; शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यावरुन उद्धव ठाकरे यांची टीका

दसरा मेळाव्याच्या पोस्टरवरुन उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर निशाणा साधला

Updated: Sep 30, 2022, 01:24 PM IST
"विचारांचे वारसदार असं सांगावं लागतं हेच दुर्दैव" ; शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यावरुन उद्धव ठाकरे यांची टीका title=
(फोटो सौजन्य - PTI)

मुंबई : पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी शिवसेनेत (shivsena) प्रवेश केला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या उपस्थित महंत सुनील महाराज यांनी शिवसेनेत (shivsena) प्रवेश केला आहे. आपल्या समर्थकांसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय महंत सुनील महाराज यांनी घेतला आहे. (Uddhav Thackeray criticism of Shinde group Dasara meeting)

यावेळी उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना शिंदे गटावर जोरदार टीका केली. "आम्ही त्या वेळी न्याय देण्याचा प्रयत्न केला. जेव्हा बंजारा समाजाच्या लक्षात आलं की, ज्यांनी न्याय दिला त्यांच्याच पाठीत वार केला त्यामुळे त्यांच्यासोबत आपण जाऊ शकत नाही. कारण बंजारा समाजाच्या रक्तात गद्दारी नाही. एका निष्ठेने ते शिवसेनेत आले आहेत," असे उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेनेचं काय होणार याचं उत्तर मिळण्याआधीच शिवसेना 10 पावलं पुढे गेलीय. अनेक जण रोज प्रवेश करत आहेत. आम्ही सोबत आहोत असे सांगत आहेत. मी शह देण्याच्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. मला पुढे जायचं आहे,  असेही उद्धव  ठाकरे म्हणाले.

दसरा मेळाव्यासाठी (Dussehra 2022) ठाकरे गट (Thackeray Group) आणि शिंदे गटाकडून (Shinde Group) जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने दोन्ही गटाकडून शक्तीप्रदर्शन केलं जात आहे. शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याची दोन पोस्टर्स (Posters) जारी करण्यात आले आहेत. एका पोस्टरवर 'आम्ही विचारांचे वारसदार' तर दुसऱ्या पोस्टरवर 'हिंदवी तोफ पुन्हा धडाडणार' असा उल्लेख करण्यात आला आहे. या पोस्टरवर बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि आनंद दिघे (Anand Dighe) यांचा फोटो  आहे. तर 'शिवसेनेचा दसरा मेळावा' असाही उल्लेख करत धनुष्यबाण चिन्ह छापण्यात आलंय. बीकेसी मैदानात शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. याबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला टोला लगावलाय.

"शिवसेना एकच आहे. इतरांचे पण दसरा मेळावे होतच असतात.  शिवसेनेचा मेळावा एकच शिवाजी पार्कवर. आम्हीच विचारांचे वारसदार असं सांगावं लागतं हेच दुर्दैव आहे," असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.