कर्नाटक घटनेवर शिवसैनिकांचा राडा, शिवाजी पार्कात आंदोलन

कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना 

Updated: Dec 19, 2021, 12:21 PM IST
कर्नाटक घटनेवर शिवसैनिकांचा राडा, शिवाजी पार्कात आंदोलन title=

मुंबई : कर्नाटकच्या घटनेचे पडसाद आता मुंबईतील दादर परिसरातही पडू लागले आहेत. शिवसैनिकांकडून या घटनेचा तीव्र निषेध केला जात आहे. शिवाजी पार्कमध्ये शिवसैनिकांनी आंदोलन करण्यात आला आहे. कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आहेत. 

सदा सरवणकर, मनीषा कायंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. यांच्यासोबत अनेक शिवसैनिक याठिकाणी उपस्थित आहेत. कर्नाटकातील घटनेचा निषेध करण्यात येणार आहे. कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. त्याचा तीव्र निषेध करण्यासाठी आमदार सदा सरवणकर, आमदार मनीषा कायंदे शिवाजी पार्क मध्ये दाखल झाले आहेत. 

माँसाहेब यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आलं आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे. 

शिवसेनेकडून कारवाईची मागणी 

बंगलोरला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना काही समाज कंटकांकडून करण्यात आली. अशा समाज कंटकांवर कठोरातील कठोर कारवाई केली गेली पाहिजे. केंद्र सरकारने देखील लक्ष देऊन यावर कारवाई केली पाहिजे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी ही बाब छोटी असल्याचे बोलले आहे. परंतु अशा लोकांमुळेच हे समाज कंटक वाढत असल्याची टीका शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील यांनी केली आहे.

राष्ट्रवादी आक्रमक

कर्नाटकात काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसही आक्रमक झाली आहे. कन्नडीकांचा निषेध केला आहे. याच पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. त्या सर्व ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जाऊन महाराजांना दुधाचा अभिषेक करणार आहेत अशी माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी दिली आहे. 

शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही - मनसे 

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान हा देशाचा अपमान आहे, मनसे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही असा इशारा मनसे नेते संदीप देशपांडेंनी दिला आहे. .कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी बेताल वक्तव्य करू नये स्वतः वर कंट्रोल ठेवावा नाहीतर आम्हाला त्यांच्यावर कंट्रोल ठेवावा लागेल असंही ते म्हणाले.कर्नाटक सरकार ने ज्या कोणी हे कृत्य केलं आहे त्यांना गजाआड केलं पाहिजे अशी मागणी त्यांनी केलीय.