'संजय राऊत मानसिक रुग्णतेच्या पर्मोच्च स्थानावर' आशिष शेलार यांची बोचरी टीका

भाजप आणि शिवसेनेतील आरोप-प्रत्यारोपांचा वाद आणखी तीव्र, भाजपवर सातत्याने टीका करणाऱ्या संजय राऊत यांच्यावर आशिष शेलार यांचा निशाणा

Updated: Feb 11, 2022, 03:21 PM IST
'संजय राऊत मानसिक रुग्णतेच्या पर्मोच्च स्थानावर' आशिष शेलार यांची बोचरी टीका title=

मुबंई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे मानसिक रुग्णतेच्या पर्मोच्च स्थानावर पोहचले आहेत, अशी बोचरी टीका भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केली आहे. संजय राऊत एकाकी पडले आहेत, त्यांच्या बाजूने बोलायला महाविकास आघाडीचा एकही नेता नाही असं शेलार यांनी म्हटलं आहे.

तसंच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या घराजवळ याच असं आव्हानही आशिष शेलार यांनी संजय राऊत यांना दिलं आहे. पण २०१४ ते २०२१ एका दिवसाआड, रोज भाजपच्या नेतृत्वावर बोलत आले, लिहित आले,  रोज भाजपला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आलात, पण सात वर्षात तुमच्या मागे ईडी लागली नाही, आज तुमची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येतायत म्हणून ईडी मागे लागली आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

ज्या संजय राऊत यांनी महाविकास आघाडीसाठी लढले ते आज एकाएकी पडले आहेत, शिवसेनेचे नेते बोलत नाहीत, राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसलेत त्यांचे नेते त्यामुळे ते राऊत यांच्या बाजूने बोलत नाहीत, दुर्दैवाने ते एकटे पडले आहेत असा टोला शेलार यांनी लगावला आहे. 

 ज्या माणसाचा स्वतःचा पक्ष कोणता हे कळत नाही त्या संजय राऊत यांनी निष्पक्षपणाची गोष्ट करतायत असं सांगत आशिष शेलार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर निष्पक्षपातीपणे कारवाई केली होती का? नितेश राणेंवर कारवाई निष्पक्षपातीपणा आहे का? मुंबई आणि राज्यातील पोलीसांचा ज्या पद्धतीने वापर केला जातोय हा पक्षपातीपणा आहे का? असे सवाल उपस्थित केले.

महापालिका निवडणुका कधी होणार?
महापालिका निवडणुका वेळेत न होण्याच्या निर्णयावरही आशिष शेलार यांनी टीका केली आहे.  लोकशाहीत निवडणुका वेळेवर झाल्या पाहिजेत, हा जनतेच्या अधिकाराचा प्रश्न आहे, निवडणुका पुढे जाणं हा मतदारांशी द्रोह आहे असं शेलार यांनी म्हटलं आहे. पाच वर्षांच्या या काळात पोट निवडणुका झाल्या, विधानपरिषदेच्या, राज्यसभेच्या निवडणुका झाल्या मग मुंबईसह इतर महापालिकांच्या निवडणुका का होऊ शकत नाही? प्रशासक नियुक्त करण्यामागे छुपा डाव आहे का? असा सवालही शेलार यांनी विचारला आहे. 

आदित्य ठाकरेंच्या वरळी पाहणी दौऱ्यावर टीका
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज वरळी मतदारसंघाची पाहणी केली. यावर बोलताना केवळ वरळीचा रस्ता किंवा ब्रिज म्हणजे मुंबई नाही, त्यासाठी मुंबईभर फइरावं लागतं, असा टोला लगावला आहे. 

'हिजाबच्या आडून राजकारण सुरु आहे'
गृहमंत्री शांततेचं आवाहन करतायत पण मालेगाव पासून मुंबईपर्यंत जे रस्त्यावर उतरवतात त्यांच्या विरुद्ध काय कारवाई केली, असा सवाल शेलार यांनी विचारला आहे. गृहमंत्र्यांनी निष्पक्ष कारवाई केली पाहिजे,  हिजाबच्या आडून जे राजकारण सुरू आहे त्याला उघडं पाडलं पाहिजे असं आवाहनही शेलार यांनी केलं आहे.  मुस्लिम महिलांचा वापर राजकारणासाठी केला जातोय हे दुर्दैवी आहे असं शेलार यांनी म्हटलं आहे.