मुंबईत राष्ट्रवादीचे ६० नगरसेवक निवडून आणायचे; अजितदादांचा निर्धार

अजित पवार यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणाऱ्या मुंबईतील नेत्यांनाही लक्ष्य केले.

Updated: Mar 1, 2020, 03:42 PM IST
मुंबईत राष्ट्रवादीचे ६० नगरसेवक निवडून आणायचे; अजितदादांचा निर्धार title=

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ५० ते ६० नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. ते रविवारी मुंबईत आयोजित केलेल्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकासआघाडी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक एकत्र लढणार असल्याचे सांगितले. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि आपल्याला मुंबईत एकही जागा मिळाली नाही. 

विधानसभा निवडणुकीतही मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसकडून केवळ नवाब मलिक निवडून आले. मात्र, आगामी काळात ही परिस्थिती बदलायला पाहिजे. मुंबईतून राष्ट्रवादी काँग्रेसचे किमान १० आमदार निवडून आले पाहिजेत. तसेच सध्याच्या घडीला मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे ८ नगरसेवक आहेत. ही संख्या ५० ते ६० पर्यंत वाढली पाहिजे. त्यासाठी आतापासूनच कामाला लागा, असे आदेश अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिले. आगामी काळात मुंबईत जम बसविण्याच्यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसने विशेष रणनीती आखली आहे. त्यानुसार राष्ट्रवादीचे मंत्री महिन्यातील एक दिवस मुंबईला देणार आहेत. 

मुंबई महानगरपालिका प्रभाग रचना बदलाचा अनेकांना धक्का

यावेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणाऱ्या मुंबईतील नेत्यांनाही लक्ष्य केले. सचिन अहिर, सुभाष मयेकर, चित्रा वाघ, प्रसाद लाड आणि संजय पाटील या नेत्यांना राष्ट्रवादीने पदे दिली. मात्र, एकही मायचा लाल राष्ट्रवादीत थांबला नाही. अशी माणसे पुन्हा पक्षात येता कामा नये. सत्ता असो किंवा नसो, ज्यांची शरद पवारांवरील निष्ठा ढळणार नाही, अशा लोकांचा शोध घ्या. केवळ सत्ता आहे म्हणून चिकटायला येणाऱ्या लोकांना दूर ठेवा, असा सल्ला अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला.