Mumbai Water : मुंबईकरांनो काळजी घ्या, पाणी उकळून आणि गाळून प्या !

Mumbai Water News : मुंबईत हवेची गुणवत्ता खूपच खालावली आहे. आता पाणीप्रश्नही गंभीर झाला आहे. मुंबई पालिकेने आवाहन केले आहे की, मुंबईकरांनो पाणी उकळून आणि गाळून प्या.

Updated: Jan 19, 2023, 02:08 PM IST
Mumbai Water : मुंबईकरांनो काळजी घ्या, पाणी उकळून आणि गाळून प्या ! title=
Mumbai Water

Mumbai Water News : मुंबईकरांनो पाणी उकळून आणि गाळून प्या, असे आवाहन मुंबई महापालिकेकडून (BMC) करण्यात आले आहे. (Mumbai Water News in Marathi) ठाण्यातून जलशुद्धीकरणासाठी पाणी वाहून नेण्यात येणाऱ्या भूमिगत पाईपलाईनला गळती लागली आहे. त्याच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी उद्यापासून ही पाइपलाईन बंद करावी लागणार आहे. तसेच पाणीपुरवठा करण्यासाठी जुन्या पाईपलाईनचा वापर करण्यात येणार आहे. जेणेकरून दुरुस्तीच्या कामामुळे ठाण्यातील काही भागात तर मुलुंडमधील वीणानगर, वैशालीनगर, स्वप्ननगरी, योगी हिल्स या भागात शुक्रवारी प्रक्रियेशिवाय पाणी पुरवठा होणार आहे. 

मुंबईतील हवेची गुणवत्ता पातळी खालावली

मुंबईची हवा दिल्ली पेक्षा जास्त प्रदुषित झाली आहे. हवेची गुणवता वाईट असल्याने याचा त्रास होत आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.  पंतप्रधान मोदींची आज मुंबईतल्या बीकेसीत जाहीर सभा आहे. मात्र, बीकेसीतली हवेची गुणवत्ता सर्वात वाईट असल्याचं समोर आले आहे. बीकेसीमध्ये हवेची गुणवत्ता 343 तर मुंबई शहराच्या हवेची गुणवत्ता 316 इतकी नोंदवण्यात आलीय.  

वायू प्रदुषणाची नोंद करणा-या सफर संस्थेच्या माध्यमातून ही माहिती समोर आलीय. मुंबईतल्या गाड्यांचं प्रदूषण, उडणारी धुळ, इमारतींची बांधकाम याचा परिणाम हवेवर होतोय. तर धुळ, धुके आणि धूर यांच्या मिश्रणानं तयार होणारं धुरकंही मुंबईवर पसरलंय. वायूप्रदुषणामुळे श्वसनाच्या आजारांत वाढ होण्याची शक्यताय. तेव्हा बाहेर पडताना काळजी घ्या असं आवाहन डॉक्टर्सनीही केले आहे. 

नाशिकची हवा दूषित होत चाललेय

मुंबई, पुणे पाठोपाठ आता नाशिकची हवा दुषित होत चालली आहे. टेरी आणि एसडीसी या संस्थांनी ही धक्कादायक माहिती दिलीय. नाशिकच्या हवेची गुणवत्ता खालावण्यात 11 क्षेत्रं कारणीभूत ठरलेत. यात उद्योग, ट्रॅफिक, रस्त्यावरील धूळ, स्मशानभूमी आणि हॉटेल्स रेस्टॉरंटमध्ये वापरल्या जाणाऱ्या इंधनामुळे जिल्ह्यातले प्रदूषण वाढलं आहे. त्यात उद्योग क्षेत्रातून 40 टक्के तर वाहतूक क्षेत्रातून 30 टक्के प्रदूषण वाढण्यात भर पडतेय. सिडको, सातपूर गाव, मुंबई नाका आणि कोणार्क नगर हे शहरातील प्रदुषणाचे हॉटस्पॉट ठरलेत. यावर काहीतरी तोडगा काढण्याची गरज निर्माण झालीये, अन्यथा नाशिककरांचं आरोग्य धोक्यात येऊ शकते.