मविआच्या वज्रमूठ सभेला शिंदे गटाचं धनुष्यबाण यात्रेतून उत्तर, 8 एप्रिलला संभाजीनगरातून सुरुवात करणार

शिंदे-फडणवीस सरकारविरोधात महाविकास आघाडी सरकारकडून राज्यभर सभा घेतल्या जाणार असून पहिली सभा 2 एप्रिलला होणार आहे. महिवाच्या सभेला उत्तर देण्यासाठी शिंदे गटानेही तयारी सुरु केली आहे.

Updated: Mar 28, 2023, 01:57 PM IST
मविआच्या वज्रमूठ सभेला शिंदे गटाचं धनुष्यबाण यात्रेतून उत्तर, 8 एप्रिलला संभाजीनगरातून सुरुवात करणार title=

Maharashtra Politics : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) सातत्यने होणारे आरोप, मविआ नेत्यांवर तपास यंत्रणांच्या माध्यमातून होणारी कारवाई, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा विविध मुद्दयांवर राण उठवण्यासाठी महाविकास आघाडी जय्यत तयारीला लागलीय. शिंदे-फडणवीस सरकारविरोधात (Shinde-Fadanvis Government) महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गट एकत्रित सभा घेणार असून याची सुरुवात 2 एप्रिलला छत्रपती संभाजीनगरमधून (Sambhaji Nagar) होणार आहे. सभेला मोठ्याप्रमाणावर गर्दी जमवण्यासाठी मविआकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. 'वज्रमुठ सभा'  असे या सभेचे घोषवाक्य असणार आहे. 

शिंद गट उत्तर देणार
महाविकासआघाडीच्या वज्रमूठ सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) धनुष्यबाण यात्रेतून (Dhanushyaban Yatra) उत्तर देणार आहेत. मविआची संभाजीनगरात 2 एप्रिलला सभा होतेय. त्याच ठिकाणाहून शिंदे गटाच्या धनुष्यबाण यात्रेला सुरुवात होईल. शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यानंतर 8 एप्रिलला धनुष्यबाण यात्रा सुरू होईल. राज्यभरात धनुष्यबाण यात्रा काढली जाणार असून यात्रेच्या जोरदार तयारील लागा अशा सुचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत. 

एकनाथ शिंदे यांनी या दृष्टीने रणनीती आखण्यासही सुरुवात केल्याचीही माहिती आहे. शिवसेनेतील आणि काँग्रेसचे मराठवाड्यातील नेत्यांचा प्रवेश करून धक्का देण्याची तयारी शिंदे गटाकडून केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या सभा झाल्या आहेत. त्याच मैदानावर एकनाथ शिंदे यांची धनुष्यबाण यात्रा सुरू होणार असल्याची माहिती आहे.

राज्यसरकारडून सावरकर यात्रा
त्याआधी राज्यात 'सावरकर गौरव यात्रा' आयोजित केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांचा वारंवार अवमान केला जात आहे, याविरोधात ही यात्रा असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलंय. वीर सावरकर यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, सावरकर यांनी देशाला स्वातंत्र्य  मिळवून दिलं. त्या स्वातंत्र्याचा उपभोग आपण सर्व घेत आहोत, स्वांतत्र्यसैनिकांनी जो त्याग केला त्यांचा जाणीवपूर्णवक अवमान करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचा निषेध देशभरातू होत असल्याचंही मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलंय.

राहुल गांधी सेक्युलर जेलमध्ये एक दिवस राहून आले तर त्यांना स्वातंत्र्याची जाणीव होईल, पण त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. सावरकर होण्याची तुमची लायकी नाही, सावकरांचा अवमान करणाऱ्या वृत्तीची आम्ही निंदा करतो असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय.

संजय राऊत यांची टीका
सावरकर गौरव यात्रेच्या नावाखाली अडानी बचाव यात्रा काढली जात असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केलाय. दिल्लीत झालेल्या बैठकीला शिवसेना उपस्थित नव्हती, राहुल गांधींशी आज चर्चा होण्याची शक्यता आहे असं राऊत म्हणाले.