राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी केंद्राकडे केल्या 'या' मागण्या

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची केंद्राकडे मागणी

Updated: Apr 14, 2021, 01:13 PM IST
राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी केंद्राकडे केल्या 'या' मागण्या title=

मुंबई : महाराष्ट्रातील वाढती कोरोना रुग्णसंख्या (Maharashtra Corona Cases) आणखी लावण्यात आलेला लॉकडाऊन (Lockdown) पाहता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी महत्वाच्या मागण्यांकडे केंद्र सरकारकडे लक्ष वेधून घेतले आहे. कमी कालमर्यादेत आवश्यक तेवढ्या लसी पुरवण्यासाठी, महाराष्ट्राला केंद्राची साथ तर हवीच असं त्यांनी म्हटलंय. 

करोनाच्या संसर्गाला तोंड द्यायचे असेल तर 100% लसीकरण करण्याची रणनिती महाराष्ट्रासाठी महत्वाची आणि कळीची असल्याचे ते म्हणाले. हे उद्दिष्ट ठेवून राज्यातल्या सर्व वयोगटातील 100% लोकांचे लसीकरण लवकरात लवकर करायला हवंय असं त्यांनी म्हटलंय. 

कोव्हिड-19 ची पहिली लाट आणि त्यानंतरची राष्ट्रीय टाळेबंदी, यामुळे महाराष्ट्रातल्या नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. याचे आर्थिक, सामाजिक पडसाद अर्थातच देशभरही पडलेले आपण अजूनही अनुभवत आहोत. ही नवी लाट रोखण्यासाठी वारंवार निर्बंध लावणे, टाळेबंदी जाहीर करणे हे महाराष्ट्राला परवडणारे नसल्याचे राज ठाकरे म्हणाले.

हे कायमचे उपाय नाहीत. पण जर राज्याला पुरेश्या लसी मिळतच नसतील तर पर्याय तरी काय उरतो? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय.

राज ठाकरेंच्या मागण्या 

महाराष्ट्र राज्याला स्वतंत्रपणे लसी खरेदी करू द्याव्या

राज्यातल्या खासगी संस्थांनाही लसी खरेदी करता याव्यात

'सिरम'ला महाराष्ट्रात मुक्तपणे, पण योग्य नियमन करून लस विक्रीची परवानगी द्यावी

लसींचा पुरवठा वेळेत व्हावा म्हणून महाराष्ट्रातल्या इतर संस्थांना (उदा. हॉफकिन आणि हिंदुस्तान अँटिबायोटिक) लस उत्पादन करण्यासाठी मुभा द्यावी

कोव्हिड-19 रोगाचा उपचार करण्यासाठी लागणारी आवश्यक औषधे, उदा. रेमडेसिवीर, ऑक्सिजन याचा पुरेसा पुरवठा राज्यात असावा म्हणून राज्याला आवश्यक पाऊले उचलण्यासाठी मोकळीक द्यावी.