दगड, काठ्या, पाणी, वरवंटा अशा ३६ 'नैसर्गिक वाद्या'तून 'जन गण मन'

अंध तरुण कलाकारांनी हे गाणं तयार केले असून त्यांच्यावरच हे चित्रित करण्यात आले आहे.

Updated: Jan 19, 2020, 10:39 AM IST

मुंबई : २६ जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाला आता काही दिवस उरले आहेत. पण याचे निमित्त साधत अनेक कलाकृती निर्माण होत आहेत. याच औचित्याने श्रीरंग फाऊंडेशन आणि ‘फ्रेम मी’ मीडियाच्या संयुक्त विद्यमाने संगीत अनावरण करण्यात आले आहे. नेत्रहिन विद्यार्थ्यांनी एकत्र येत संगीत ध्वनीच्या माध्यमातून शांततेचा संदेश दिला आहे. दगड, लाठी ही आंदोलनाची प्रतिकं मानली जातात. पण याच गोष्टींचा संगीतात उपयोग करुन त्यांना सूर आणि तालाची जोड देत कलात्मक पद्धतीने हे कलाकार व्यक्त झाले आहेत. 

अनैसर्गिक ध्वनीच्या माऱ्यामुळे होणाऱ्या प्रदुषणाच्या मोठ्या समस्येतून आपण सध्या जात आहोत. अशा वेळी नैसर्गिक ध्वनी निर्मितीचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखीत होतंय. दगड, पाणी, लाकूड यातून निर्माण होणारा ध्वनी ऐकण्यासाठीही अल्हाददायक असतो. अशा ३६ नैसर्गिक वस्तूंचा वापर करुन राष्ट्रगीत ध्वनीबद्ध करावं अशी संकल्पना कलादिग्दर्शक आणि ‘श्रीरंग’चे संस्थापक सुमीत पाटील यांना सुचली. ध्वनीचं ज्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे अशा नेत्रहिन तरुणांना घेऊन त्यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे. काळाचौकी येथील शिवाजी हायस्कूल येथे कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते या संगीताचे अनावरण करण्यात आले आहे. यावेळी नेत्रहिन तरुणांनी देशभक्तीपर गाणी गाऊन उपस्थितांची मनं जिंकली.दिग्दर्शक, अभिनेते मकरंद सावंत यांनी या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.

विद्यार्थ्यांपासून ते सैनिकांपर्यंत आपण प्रत्येकजण आपापल्या परिने देशाच्या हितासाठी योगदान देत असतो. आपली ही सार्वभौमत्वता, अखंडता कायम टिकून राहावी, याचे स्मरण आपल्याला राष्ट्रगीतातून होत असते. महत्वाचे म्हणजे नेत्रहिन विद्यार्थ्यांनी ही संपूर्ण कलाकृती साकारणे हे माझ्यासाठी एक नवी दृष्टी देणारे होते असे ‘फ्रेम मी’चे संस्थापक भरत शिंदे यांनी सांगितले.

या गाण्यातील विशेष बाब म्हणजे बासरी, तबला, पेटी या पारंपारिक वाद्यांसह दगड, पाटा-वरवंटा, सूप, पाणी, पिपाणी, घुंगरु अशा ३६ नैसर्गिक वस्तूंचा उपयोग गाण्याचे संगीत तयार करण्यासाठी केला गेला आहे. अंध तरुण कलाकारांनी हे गाणं तयार केले असून त्यांच्यावरच हे चित्रित करण्यात आले आहे. प्रशांत बानिया, जयेश बानिया, मनश्री सोमण आणि योगिता तांबे अशी या नेत्रहिन कलाकारांची नावे आहेत. हे गाणं पाहील्यावर नेत्रहिन कलाकार आपल्याला जगण्याची नवी दृष्टी देतात हे कळते.

कलादिग्दर्शक सुमीत पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या गाण्याचे संगीत प्रशांत आणि निशांत यांनी केले असून निला माधव माहोपात्रा, संदेश कदम यांनी संगीत सहाय्य केले आहे. याचे डीओपी आदित्य नाईक, आरती कडवकर तर सौरभ नाईक यांनी व्हिडीओ एडीटींग केले आहे.