कोरोनाचा धोका लक्षात घेऊन मुंबईमध्ये आणखी ५०० आयसीयू बेड्स

 संभाव्य धोका लक्षात घेऊन नव्याने मुंबईत आणखी ५०० आयसीयू बेड्स आठवडाभरात उलब्ध करण्यात येणार आहेत.  

Updated: Jun 12, 2020, 06:40 AM IST
कोरोनाचा धोका लक्षात घेऊन मुंबईमध्ये आणखी ५०० आयसीयू बेड्स   title=
संग्रहित छाया

मुंबई : पावसाळ्यात मुंबईत कोरोनाचा हाहाकार उडेल, अशी शक्यता मुंबई आयआयटीने प्रसिद्ध केलेल्या अहवालात व्यक्त केली आहे. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन नव्याने मुंबईत आणखी ५०० आयसीयू बेड्स आठवडाभरात उलब्ध करण्यात येणार आहेत. मुंबई कोरोनाबाधितांचा आकडा एक लाखाच्या घरात पोहोचला आहे. त्यामुळे अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये अतिदक्षता विभागाचे (आयसीयू) नव्याने ५०० बेडस् आठवडाभरात उपलब्ध होणार असून राज्यातील अन्य जिल्ह्यांमधून २०० ते ३०० डॉक्टर्स मुंबईत सेवा देण्यासाठी उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी येथे दिली. 

दरम्यान, काल राज्यामध्ये कोरोनाबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्याचे आरोग्यमंत्री टोपे, प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल तसेच काही जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांशी संवाद साधला.

राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर जवळपास ५० टक्के असून मुंबईतील धारावी भागातून गेल्या काही दिवसांपासून रुग्ण येण्याची संख्या मदावली आहे, असे टोपे यांनी यावेळी सांगितले. अतिदक्षता विभागातील खाटा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगताना सेव्हन हिल, सेंट जॉर्ज येथे आठवडभरात सुमारे ५०० आयसीयू बेड उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्राने कंटेनमेंट झोनसाठीचे निकष बदलावे

केंद्र शासनाने कंटेनमेंट झोनसाठी जे निकष केले आहेत त्यात बदल करण्याबाबतची मागणी आरोग्यमंत्री  टोपे यांनी यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली. कंटेनमेंट झोनमध्ये शेवटचा रुग्ण आढळल्यानंतर २८ दिवस त्या भागातील व्यवहार बंद ठेवले जातात. हा बंद काटेकोरपणे पाळला जावा यासाठी पोलिस तैनात केले जातात. त्यामुळे राज्यातील पोलिस मोठ्या संख्येने अशा कंटेनमेंट झोनच्या ड्युटीवर आहेत. 

या पोलिसांना आराम मिळावा हा पोलीस फोर्स अन्यत्र वापरता यावा यासाठी २८ दिवसांच्या निकषाऐवजी १४ दिवस कंटेनमेंट झोनमध्ये व्यवहार बंद ठेवण्याबाबत विचार व्हावा आणि त्यावर केंद्र शासनाकडून मार्गदर्शक सूचना पाठविण्यात याव्या, अशी मागणी टोपे यांनी केली.