'मी पुन्हा येईन' म्हणणाऱ्या फडणवीसांसमोरची १० आव्हानं

गेली पाच वर्षं हुशार विद्यार्थी ठरलेल्या फडणवीसांसमोर सध्या कठिण पेपर आलाय

Updated: Nov 5, 2019, 06:44 PM IST
'मी पुन्हा येईन' म्हणणाऱ्या फडणवीसांसमोरची १० आव्हानं title=

मुंबई : सत्तास्थापनेच्या तिढ्यात देवेंद्र फडणवीस काय करतात? याकडे लक्ष लागलंय... गेली पाच वर्षं हुशार विद्यार्थी ठरलेल्या फडणवीसांसाठी हा पेपर मात्र अवघड आहे. गेली पाच वर्षांतली देवेंद्र फडणवीसांच्या कारकीर्दीत आव्हानं भरपूर होती पण फडणवीस बऱ्यापैंकी त्यांना पुरून उरले. पण देवेंद्र फडणवीसांची खरी परीक्षा आता आहे.

फडणवीसांपुढचे १० अवघड प्रश्न

- राज्यात चर्चेचे सर्वाधिकार केंद्रीय नेतृत्वानं फडणवीसांना दिलेत. म्हणजेच राज्यातला घोळ तुम्हीच निस्तरा, असं सांगितलंय

- शिवसेना दाद देत नाही

- वर्षावरुन मातोश्रीवर गेलेले फोन उचलले जात नाहीत, अशी चर्चा आहे

- उद्धव ठाकरेंचं मन वळवण्याचं मोठं आव्हान फडणवीसांपुढे आहे

- संजय राऊत एवढं बोलतायत, की त्यानंतर शिवसेनेला एक पाऊल मागे आणणं फडणवीसांना कठीण जाणार आहे

- फडणवीस आणि उद्धव यांच्यातला दुरावा मिटवणारा सशक्त मध्यस्थ सध्या तरी दिसत नाही- शिवसेनेचा विषय सोडून दिला, तर राष्ट्रवादीच्या मदतीसाठी पवारांना साद घालणं तितकं सोपं राहिलेलं नाही

- फडणवीसांना मुख्यमंत्री व्हायचं असेल आणि भाजपाचं सरकार यायला हवं असेल तर किमान २५ आमदारांची गरज आहे... इतर पक्षांचे आमदार फोडणं आता मुळीच सोपं राहिलेलं नाही

- निवडणुकीत सर्वाधिकार स्वतःकडे ठेवल्यानं आता स्वतःच्या पक्षातूनच फडणवीसांना कितपत मदत मिळतेय, याबद्दल साशंकता आहे

- सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केंद्रीय नेतृत्वानं फडणवीसांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केलं असलं तरीही आता मात्र केंद्राचे नेते फडणवीसांच्या मदतीच्या मूडमध्ये दिसत नाहीत

आता साम-दाम-दंड-भेद, राजकीय अनुभव, राजकीय हुशारी या सगळ्याच्या आधारावर कायद्याच्या या विद्यार्थ्याला मोठ्या परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे. आता फडणवीस नॉकआऊट पंच मारणार का आणि गेम फिरवणार का? याची उत्सुकता आहे.