"अज्ञान पाजळायची संधी संजय राऊत यांनी सोडलेली नाही"

Ashish Shelar : बाबासाहेबांच्या जन्मस्थळावरुन गोंधळ करण्यापर्यंत यांची मिजास गेली आहे. खोटी माहिती पसरवणं चूक आहे. त्यातून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, असेही आशिष शेलार म्हणाले

Updated: Dec 16, 2022, 01:37 PM IST
"अज्ञान पाजळायची संधी संजय राऊत यांनी सोडलेली नाही" title=
(फोटो सौजन्य - PTI)

Maharashtra Politics : डॉ. बाबासाहेब आंबेडकर (dr Babasaheb Ambedkar) यांचा जन्म महाराष्ट्रात झाला असे विधान केलेल्यामुळे सध्या खासदार संजय राऊत हे भाजपच्या निशाण्यावर आले आहे. या विधानानंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर चौफेर बाजूने टीका केली जात आहे. या प्रकरणी आता भाजप रस्त्यावर उतरणार आहे. भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी पत्रकार परिषद घेत भाजप उद्या मुंबईत माफी मांगो आंदोलन करणार माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली.

संजय राऊत यांना भाई गिरकर यांची बाबासाहेब आंबेडकरांसंबंधी दोन पुस्तकं पाठवली आहेत. त्यांनी याचा अभ्यास करावा, असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

बाबासाहेबांच्या जनस्थळाचा वाद निर्माण करुन अफगाणी संकट आणलं - आशिष शेलार

"डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला यावरुन वाद निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे. याच्यामागची कारणं अस्पष्ट आहेत. बाबासाहेबांच्या जनस्थळाचा वाद निर्माण करुन अफगाणी संकट आले आहे. आपलं अज्ञान पाजळायची संधी संजय राऊत यांनी सोडलेली नाही हे आम्ही आधीही पाहिलं आहे. बाबासाहेबांच्या जन्मस्थळावरुन गोंधळ करण्यापर्यंत यांची मिजास गेली आहे. खोटी माहिती पसरवणं चूक आहे. त्यातून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय," असे आशिष शेलार यांनी म्हटलं.

हे ही वाचा >> भाजपच्या लोकांचे मेंदू किड्या मुंग्यांचे - संजय राऊत

नव्याने इतिहास लिहिण्याचा प्रयत्न 

"संजय राऊत उद्या स्वातंत्र्य, संविधान आणि बंधुताही उद्धव ठाकरेंमुळे मिळाली आहे असं तर छापणार नाही ना? नव्याने इतिहास लिहिण्याचा प्रयत्न सुरु असून भाजपाला हे मान्य नाही. भाजपा याचा निषेध करत असून उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी," असेही शेलार म्हणाले.

अफगाणी सुपारी मिळाली आहे का? 

"तालिबानच्या भागात गौतम बुद्धांच्या प्रतिमांवर हल्ला झाल्याचं आम्ही पाहिलं होतं. आता शांततापूर्ण आणि शांततेचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धांचे अनुयायी असणारा समाज आणि त्यातही आमचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थानाचा वाद निर्माण केला जात आहे. याबाबत अंहकारात उत्तर देऊन पळवाट निघू शकत नाही. बाबासाहेबांच्या जन्मस्थळाबाबत वाद निर्माण करण्यासाठी तुम्हाला अफगाणी सुपारी मिळाली आहे का? बाबासाहेबांचा विचार असा संपवता येणार नाही. त्यामुळे तुम्हाला माफी मागावी लागेल," असे आशिष शेलार यांनी स्पष्ट केले.