आखाती देशांतील २६ हजार कोरोना संशयित मुंबईच्या वाटेवर, यंत्रणा सज्ज

भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या १७१ वर गेली आहे.

Updated: Mar 19, 2020, 11:44 AM IST
आखाती देशांतील २६ हजार कोरोना संशयित मुंबईच्या वाटेवर, यंत्रणा सज्ज  title=

मुंबई : भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या १७१ वर गेली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ४७ वर गेलाय. देशात कोरोनाचे संकट अधिक गडद होताना दिसत आहे. याच पार्श्वभुमीवर गुल्फ देश म्हणजेच युएई, कुवैत, कतार आणि ओमनमधून साधारण २६ हजार कोरोना संशयित मुंबईत आणले जाण्याची शक्यता आहे. मुंबईतील यंत्रणा यासाठी सज्ज असल्याचे सांगण्यात येत आहे. ३१ मार्चपर्यंत हो रुग्ण मुंबई विमानतळावर दाखल होऊ शकतील. पालिका यासाठी यंत्रणा सज्ज ठेवत आहे. या देशांमधून दररोज २३ फ्लाईट येणार आहेत.

दुबईतून आलेले १५ जण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना पवईतील नवे सेंटर तसेच मरोळ येथील सेव्हन हिल रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आलंय.

५० टक्के कर्मचारी

कोरोना व्हायरसचा धोका कमी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी कार्यालयीन उपस्थिती कमी करण्याचा आणि गर्दी टाळण्यासाठी पावले उचलली आहेत.  यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. यामध्ये राज्यातील शासकीय कार्यालयात एक दिवसाआड पद्धतीने रोज ५० टक्के कर्मचारी येण्याचा सूचना केल्या आहेत.

तसेच रेल्वे, एसटी बसेस, खासगी बसेस, मेट्रो ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही ५० टक्के प्रवासी क्षमतेने चालविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबईत बेस्टमधील उभे राहणारे प्रवाशी बंद करण्यात येतील. तसेच प्रवाशी अंतराने बसावेत यासाठी तशा सूचना प्रवाशांना देण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबईतील दुकानांच्या वेळा अशा तऱ्हेने ठरविण्यात येतील की, सर्व दुकाने अंतरा अंतराने सकाळी आणि दुपारी सुरु होतील. बाजारातील तसेच गर्दीच्या ठिकाणातील रस्ते यामध्ये देखील एक दिवसाआड किंवा वेळांमध्ये बदल करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.