Mumbai Water Cut : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, मुंबईत 'या' तारखेपासून 30 दिवस 15 टक्के पाणी कपात

जलबोगदा दुरुस्ती कामामुळे, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात दिनांक 31 मार्च 2023 पासून पुढचे 30 दिवस 15 टक्के पाणीकपात होणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. 

Updated: Mar 28, 2023, 08:02 PM IST
Mumbai Water Cut : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, मुंबईत 'या' तारखेपासून 30 दिवस 15 टक्के पाणी कपात title=

Mumbai Water Cut : बृहन्मुंबई महानगरपालिका (Mumbai Municipal Corporations) क्षेत्राला पाणीपुरवठा (Water Supply) करणाऱ्या जलबोगद्याला ठाणे (Thane) इथं कूपनलिकेच्या खोदकामामुळे हानी पोहोचून गळती होत आहे. ही गळती (Leakage) दुरुस्त करण्याचे काम शुक्रवारपासून म्हणजे 31 मार्च 2023 पासून सुरु करण्यात येणार आहे. या कारणाने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात दिनांक 31 मार्च 2023 पासून पुढील 30 दिवस 15 टक्के पाणीकपात लागू राहणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ठाणे शहराला पुरवल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्याला देखील ही कपात लागू राहील.

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत मुंबई शहर (Mumbai City) आणि उपनगराच्‍या (Mumbai Suburbs) एकूण पाणीपुरवठ्यापैकी सुमारे 65 टक्‍के पाणीपुरवठा हा भांडुप संकूल (Bhandup Complex) येथील जलशुद्धीकरण केंद्राद्वारे (Water Treatment Plant) केला जातो. या केंद्रास होणारा 75 टक्‍के पाणीपुरवठा मुख्‍यत्‍वे 5,500 मिलीमीटर व्‍यासाच्‍या 15 किलोमीटर लांबीच्‍या जलबोगद्याद्वारे होतो. या जल बोगद्यास ठाणे इथं कूप‍नलिकेच्‍या खोदकामामुळे हानी पोहचल्याचे निदर्शनास आले आहे. या हानीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. पर्यायाने, पाणी गळती दुरुस्‍तीसाठी हा जलबोगदा पूर्णपणे बंद करणं आणि दरम्‍यानच्‍या काळात पर्यायी जलवाहिन्यांद्वारे भांडुप संकुल जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी पोहचविणे आवश्‍यक आहे. पर्यायी पाणीपुरवठा व्‍यवस्‍था कार्यान्वित करण्‍यासाठी काही अत्‍यावश्‍यक बदल करणे गरजेचे झाले आहेत.

या कारणाने, वहन व्‍यवस्‍थेत बदल सुरु असताना आणि जलबोगदा दुरुस्‍तीच्या काळात मुंबई शहर तसंच उपनगराचा पाणीपुरवठा बाधित होणे अटळ आहे. पर्यायी व्‍यवस्‍थेला देखील काही तांत्रिक कारणास्‍तव पूर्ण क्षमतेने वापरासाठी मर्यादा आहेत. त्यामुळे सध्‍या भांडुप संकुल इथं प्रक्रिया होत असलेल्‍या प्रमाणाइतके पाणी पोहचविणे आणि प्रक्रिया करणे शक्‍य होणार नाही

या सर्व बाबी लक्षात घेता, बृहन्‍मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी आणि बृहन्‍मुंबई महानगरपालिकेतर्फे ठाणे शहरास होणाऱ्या प्रक्रियायुक्‍त पाणीपुरवठ्यात दिनांक 31 मार्च 2023 पासून जलबोगदा पाणी गळती दुरुस्‍तीचे काम पूर्ण होईपर्यंत अंदाजे 30 दिवस कालावधीसाठी 15 टक्‍के कपात करण्‍यात येणार आहे.

या काळात पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसंच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.