'वाया गेलेल्या लोकांच्या...' आंतरवालीत पोहोचताच मनोज जरांगे सदावर्ते, भुजबळांवर बरसले

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश मिळाल्यानंतर ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी पलटवार केला. भुजबळांच्या टीकाल मनोज जरांगे आंतरवालीत पोहोचल्यावर सडेतोड उत्तर दिलं. 

नेहा चौधरी | Updated: Jan 28, 2024, 10:22 AM IST
'वाया गेलेल्या लोकांच्या...' आंतरवालीत पोहोचताच मनोज जरांगे सदावर्ते, भुजबळांवर बरसले title=
wasted people Manoj Jarange Criticism to chhagan bhujbal and gunaratna sadava in antarwali maratha reservation

Manoj Jarange : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) एल्गार ज्या आंतरवाली गावातून देण्यात आला तिथे जेव्हा मनोज जरांगे पाटील पोहोचले तेव्हा त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या मराठा आरक्षणाचा प्रश्नावर शिंदे सरकारने तोडगा काढला. मनोज जरांगे यांनी आंतरवाली गावातून उपोषण करुन मुंबईच्या दिशेने मोर्चा काढला होता. हा मोर्चा मुंबईत धडकताच शिंदे सरकारला त्यावर तोडगा काढण्याशिवाय पर्याय नव्हता. मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने मोठा निर्णय घेतला. नोंदी मिळालेल्या सर्व लोकांच्या परिवारास कुणबी प्रमाणपत्र मिळाले पाहिजे ही मनोज जरांगे यांची मागणी मान्य झाली. सगेसोयऱ्यांना प्रमाणपत्र मिळाले पाहिजे, त्याशिवाय सोयऱ्यांचा फायदा होणार नाही ही मागणी सरकारने मान्य केली. कुणबी नोंद सापडणाऱ्यांच्या सोयऱ्यांनाही सरसकट प्रमाणपत्र द्यावे आणि शपथपत्र घेऊन सगेसोयऱ्यांना प्रमाणपत्र द्या ही मागणी मान्य झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलं. (wasted people Manoj Jarange Criticism to chhagan bhujbal and gunaratna sadava in antarwali maratha reservation)

त्यानंतर ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांनी संधी गमावली हा त्यांचा विजय नाही, अशी टीका केली. भुजबळांच्या या टीकेकडे मनोज जरांगे यांनी दुर्लक्ष केलं असं सगळ्यांना वाटलं. मात्र आंतरवालीमध्ये दाखल होताच त्यांनी भुजबळांसह वकील गुणरत्न सदावर्ते यांचा खरपूर  समाचार घेतला. 'वाया गेलेल्या लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका' असा सल्लाही त्यांनी आंतरवाली गावातील जमलेल्या समर्थकांना दिला. 

गावाकरांना संबोधताना जरांगे म्हणाले की, यांचं ऐकायची गरज मुळीच नसून घटना तज्ञ मराठा आरक्षणासंदर्भात काय म्हणतात हे जास्त महत्त्वाचं आहे. उल्हास बापट आणि उज्वल निकम यांची प्रतिक्रिया नीट पाहा. बाकीचे हे वाया गेलेली लोक असून यांचं बोलणं मनावर घ्यायची गरज अजिबात नाही. कायदा पारित झाला हा मराठ्यांच्या हिताचा निर्णय असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितल. आता करायचं असल्यास कोणीही चॅलेंज करू शकतो आणि ते कोर्टाची पायरीही चढू शकतो. सगळ्या अध्यादेशाच्या आदेशाचे कायद्यात रूपांतर झालं म्हणजे मराठ्यांचा सातबारा पक्का झाला असल्याचही मनोज जरांगे यांनी आंतरगावातील प्रत्येकाला दिलं. 

त्याशिवाय विश्वास बसत नाही एवढं मोठं कायदा पारित झाला, अशा शब्दात मनोज जरांगे यांनी आनंद व्यक्त केला. आता कायद्यात रूपांतर करण्यासाठी सरकारला अधिवेशन घ्यावे लागणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.