शिंदेच CM राहतील का? ठाकरेंच्या सेनेचा फडणवीसांना सवाल; म्हणाले, 'उठाठेवींआधी आपल्या भरगच्च..'

CM Candidate In Mahayuti: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या एका विधानावरुन ठाकरेंचा पक्ष खवळला असून त्यांनी फडणवीसांना काही प्रश्न विचारलेत.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 9, 2024, 07:09 AM IST
शिंदेच CM राहतील का? ठाकरेंच्या सेनेचा फडणवीसांना सवाल; म्हणाले, 'उठाठेवींआधी आपल्या भरगच्च..' title=
ठाकरे गटाचा हल्लाबोल

"हरयाणा, जम्मू-कश्मीर या दोन्ही राज्यांत भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव होत आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींचा चेहरा दोन्ही राज्यांत चालणार नाही यावर दुमत असण्याचे कारण नाही. महाराष्ट्र व झारखंड राज्यांच्या निवडणुकाही हरयाणाबरोबर व्हायला हरकत नव्हत्या, पण इथेही मोदी-शहांचे चेहरे लोकांना पसंत नाहीत," असा टोला 'सामना'च्या 'चेहरा कोण?' मथळ्याखालील अग्रलेखातून लगावण्यात आला आहे. "शिंदेंनी गुवाहाटीत रेड्यांचे कितीही बळी दिले तरी महाराष्ट्राच्या जनतेचे मनपरिवर्तन होणार नाही, असेच एकंदरीत वातावरण आहे. पुन्हा ज्यांना स्वतःचा चेहरा धड नाही असे देवेंद्र फडणवीस दुसऱ्यांच्या चेहऱ्याची उठाठेव करतात हे गमतीचे आहे," असंही ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.

महायुतीत तिघांच्या तीन...

"मुळात फडणवीसांच्या तथाकथित महायुतीत मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीस-शिंदे व अजित पवार यांच्यातच खेचाखेची सुरू आहे. फडणवीस हे ठामपणे सांगू शकतील काय की, 2024 ला निवडणुका होताच शिंदे हेच मुख्यमंत्रीपदावर राहतील? अजितदादा तर मुख्यमंत्रीपदासाठी इतके उतावीळ आहेत की, त्यांनी स्वतःला गुलाबी रंगात न्हाऊन घेतले आहे आणि फडणवीस तर नागपूरच्या खिडकीत बसून येणाऱ्या-जाणाऱ्यांना ‘‘शुक।s। शुक।s’’ करून बोलवत आहेत. या तिघांच्या तीन तऱ्हा असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार नाहीत असे फडणवीस सांगत आहेत. म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या लोकप्रियतेची व नेतृत्वाची भीती त्यांच्या मनात बसली आहे," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलंय.

दुसऱ्यांचे बूड का खाजवत बसले आहेत?

"फडणवीस हे महाविकास आघाडीच्या चेहऱ्याची उठाठेव करतात, पण स्वतःच्या महायुती वगैरेबाबत मात्र ते सांगतात की, ‘मुख्यमंत्रीपदाचा चेहरा विधानसभा निवडणुकीनंतरच ठरवू. विधानसभा निवडणूक मिंध्यांच्याच नेतृत्वाखाली लढणार, परंतु नंतर मुख्यमंत्री कोण होणार हे सांगू शकत नाही.’ यांच्याच बुडाखालची स्थिती ही असताना हे महाशय दुसऱ्यांचे बूड का खाजवत बसले आहेत? ‘लाडकी बहीण योजने’च्या श्रेयावरूनही तिघांमध्ये बिघाडी आहे. ती आधी दुरुस्त करा आणि मग इतरांच्या चेहऱ्यावर बोला," असा खोचक सल्ला ठाकरेंच्या पक्षाने दिला आहे.

नक्की वाचा >> ...म्हणून CM पदाचा चेहरा हवाच; ठाकरेंच्या सेनेची मागणी! म्हणाले, 'गोपीनाथ मुंडेंनी केले तेच फडणवीसांनी..'

अपमान सहन करून...

"2019 ला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील व ते लोकप्रिय मुख्यमंत्री ठरतील असे फडणवीसांना किंचितही वाटले होते काय? पण ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यांनी शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईतून व जनतेला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढले. आपल्या साधेपणाने त्यांनी महाराष्ट्राचे मन जिंकले. ठाकऱ्यांच्या अडीच वर्षांच्या काळात कट-कारस्थानांचे गावठी उद्योग महाराष्ट्रात बंद झाले हे सत्य नाही काय? पण दिल्लीत कट-कारस्थाने घडवून गुजराती व्यापाऱ्यांनी त्यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार पाडले व मिंधेंसारखे मतलबी लोक डरपोक स्वभावानुसार दिल्लीकरांना शरण गेले. यात शौर्य ते कसले? स्वतः फडणवीस हे अपमान सहन करून सध्या सत्तेत आहेत. त्यांचा चेहराच त्याची साक्ष देतोय. अशा फडणवीसांना उद्धव ठाकरे यांचा चेहरा त्रास देत आहे," असं अग्रलेखात म्हटलं आहे.

तो अधिकार फडणवीसांना कोणी दिला?

"महाराष्ट्राला मोदी-शहा मान्य नाहीत व फडणवीसांचा बदनाम चेहरा राज्यातील जनतेने नाकारला आहे, पण स्वतःचा चेहरा झाकून फडणवीस यांनी जाहीर केले की, उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचा चेहरा नसतील. ही नसती उठाठेव करण्याचा अधिकार फडणवीस यांना कोणी दिला? अशा उठाठेवी करण्याआधी आपल्या भरगच्च बुडाखाली काय जळतेय याची काळजी त्यांनी घ्यायला हवी," असं ठाकरेंच्या पक्षाने म्हटलं आहे.