Heat Stroke : लग्न आटोपून घरी परतली अन्... उष्माघाताने घेतला तिघांचा बळी

Heat Stroke : राज्यात एकीकडे सूर्य आग ओकत असताना वातावरणात दमटपणा वाढल्यामुळे लोक घामाघूम होत आहे. राज्यात अनेक ठिकाणी तापमान 40 अंशाच्या पुढे गेले आहे. अशातच राज्यात तिघांचा उष्माघातामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे

आकाश नेटके | Updated: May 13, 2023, 05:11 PM IST
Heat Stroke : लग्न आटोपून घरी परतली अन्... उष्माघाताने घेतला तिघांचा बळी title=

Heat Stroke : गेल्या काही दिवसांपासून राज्यात झालेल्या तापमान (temperature) वाढीमुळे जनता हैराण झाली आहे. सकाळपासूनच उन्हाच्या जळा बसत असल्याने अनेक जण घरातून बाहेर पडणं टाळत आहेत. वारंवार बदलणाऱ्या वातावरणामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहेत. अशात राज्यात उष्माघातामुळे तीन जणांचा बळी गेला आहे. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात दोन महिलांचा तर नांदेडमध्ये (Nanded) एका तरुणाचा उष्माघाताने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची  नोंद केली आहे.

राज्यात तापमानात दिवसेंदिवस वाढत होत असताना जळगाव जिल्ह्यात उष्माघातामुळे दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. रावेर तालुक्यात देखील नम्रता चौधरी आणि अमळनेर येथील रुपाली राजपूत यांचा उष्माघातामुळे बळी गेला.  शवविच्छेदनानंतर उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. सध्या जळगाव जिल्ह्याचा पारा 44.9 अंश या उच्चांकी पातळीवर आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

लग्नसोहळ्यावरुन परतली आणि मृत्यूने गाठलं

अमरावती येथे विवाह सोहळा आटोपून अमळनेर येथे परतलेल्या रूपाली गजेंद्रसिंग राजपूत  यांचा  उष्माघाताने मृत्यू झाला आहे. रुपाली राजपूत या गुरुवारी अमरावती येथे विवाह सोहळ्यानिमित्त गेल्या होत्या. तेथून त्या रेल्वेने सायंकाळी घरी परतल्या. घरी आल्यानंतर रूपाली यांना मळमळ, उलट्यांचा त्रास सुरु झाला. यावेळी त्यांचे पती गजेंद्रसिंग ऊयांनी त्यांना तांबेपुरा येथील खासगी डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी उष्माघात असल्याचे सांगत गोळ्या औषधे देऊन प्राथमिक उपचार केले. थोडावेळ रुपाली यांना बरेही वाटले. मात्र सकाळी उठल्यानंतर पुन्हा रुपाली यांना उलट्या मळमळ असा त्रास सुरु झाला. त्यावेळी गजेंद्रसिंग यांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

 नांदेडमध्ये उष्माघाताने युवकाचा मृत्यू

उष्माघाताने नांदेड जिल्ह्यात पहिला बळी गेला. हिमायतनगर येथील 28 वर्षीय युवकाचा उष्माघाताने मृत्यू झाला. विशाल मादासवार हा युवक काल शेतात कामासाठी गेला होता. दिवसभर उन्हात काम करून तो सायंकाळी घरी परतला. घरी आल्यावर त्याला मळमळ सुरू होऊन अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर विशालला तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी सकाळी त्याला उलटी झाली. उपचारादरम्यान विशालचा मृत्यू झाला. दरम्यान नांदेडमध्ये तापमान 43 डिग्री पर्यंत वाढल्याने उष्माघाताची भीती वाढली आहे.

वाशिममध्ये तापमानाचा पारा 43 अंशाच्या पुढे

वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसाने मागील आठवड्यात थैमान माजवल्यानंतर आता तापमान वाढू लागलं आहे. शनिवारी जिल्ह्यात तापमानाचा पारा 43 अंशावर गेला असून सूर्य आग ओकू लागला आहे. नागरिकांनी उष्माघातापासून वाचण्यासाठी वेळोवेळी पाणी, शीतपेय, ग्लुकोज प्यावे असे आवाहन आरोग्य विभागाने केले असून दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत कामाविना घराबाहेर पडू नये असेही आवाहन करण्यात आले आहे. 17 मे पर्यंत तापमान वाढीचा इशारा देण्यात आला आहे.