तुफान पाऊस : या 5 जिल्ह्यांत जोरदार तडाखा; घर - दुकानांत पाणीच पाणी, शेतीचे प्रचंड नुकसान

Heavy rains in Marathwada : औरंगाबादमद्ये मुसळधार पावसाचा (Rain) मोठा फटका बसला आहे. ( Heavy rains in Aurangabad) पावसाने दाणादाण उडवून दिली आहे.

Updated: Sep 8, 2021, 12:54 PM IST
तुफान पाऊस : या 5 जिल्ह्यांत जोरदार तडाखा; घर - दुकानांत पाणीच पाणी, शेतीचे प्रचंड नुकसान title=
संग्रहित छाया

औरंगाबाद, बीड, नांदेड : Heavy rains in Marathwada : औरंगाबादच्या पाचोड भागात झालेल्या मुसळधार पावसाचा (Rain) फटका इथल्या मोसंबीच्या बागांना बसला आहे. ( Heavy rains in Aurangabad) मोसंबीच्या बागा पाण्याखाली गेल्या आहेत. त्यामुळे झाडांचे मोठं नुकसान झाले आहे. पाण्याचा वेळीच निचरा न झाल्यास मुळकूज, बुरशीचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता आहे. 

औरंगाबादमध्ये काल रात्री तुफान पाऊस झाला. शेतातील पीकं पूर्ण आडवी झाली आहेत. पाणी शेतात शिरल्यामुळे शेताला नदीचं स्वरुप आले आहे. शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आहेत. सरकारने मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. औरंगाबादमध्ये पावसाचा जोर ओसरला असला तरी टिळक पथ बाजारपेठेतील अनेक दुकानांत अजुनही पाणी आहे.. पंप लाऊन पाणी उपसण्याचं काम सुरु आहे. 

पावसाने दाणादाण उडवली

औरंगाबाद बाजारपेठेत पावसाने दाणादाण उडवलीय. औषधी भवन परिसरात 8 ते 10 गाड्या वाहून गेल्या. त्यातल्या काही गाड्या काढण्यात नागरिकांना यश आले आहे. मात्र अजूनही काही गाड्या पाण्याखालीच आहेत. इथल्या दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे मोठं नुकसान झाले आहे. तर हर्सूल तलाव आता पूर्ण क्षमतेने भरला आहे. सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहत आहे. 

या पुरातन निजामकालीन तलावातून औरंगाबादच्या जुन्या शहराला पाणीपुरवठा होतो. जवळपास महापालिकेच्या 20 ते 25 वॉर्डला या तलावातून पाणीपुरवठा होतो. आता जुन्या शहराला किमान वर्षभर तरी यातून पाणीपुरवठा होऊ शकेल. हा तलाव भरल्यामुळे जायकवाडीवरील पाण्याचा ताण कमी झालाय. 

निम्म्या मराठवाड्याची पाण्याची चिंता मिटली

जोरदार पावसाने मराठवाड्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. अनेक छोटी-मोठी धरणं भरली आहेत. सततच्या पावसानं धरणं ओव्हरफ्लो झाली आहे. तर जायकवाडीतही पाण्याची आवक सुरुच आहे. औरंगाबादच्या कन्नड तालुक्यात सर्वत्र अतिवृष्टी झाली आहे. तालुक्यातील सर्वात मोठा शिवना टाकळी प्रकल्प 95 टक्के भरला आहे. या धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे परिसरातील तसेच या नदीकाठी वसलेल्या सर्व गावांना प्रशासनाने इशारा देण्यात आला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून औरंगाबादसह मराठवाड्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे अजिंठा लेणीजवळील सप्तकुंड धबधबा प्रवाहित झाला आहे. या धबधब्याचं मोहक दृश्य सध्या पर्यटकांना मोहिनी घालत आहे. बऱ्याच दिवसानंतर इतका मुसळधार पाऊस झाला आणि हा धबधबा प्रवाहित झाला. 

बोरणा नदीला पूर

बीडच्या परळी तालुक्यातील बोरणा नदीला पूर आलाय. ही नदी मांडवा गावाजवळून वाहते. मात्र पहिल्यांदाच दुथडी भरुन वाहू लागली आहे.  या गावातील मंदिरही पाण्यामध्ये गेली आहेत.तर, वडवणी तालुक्यामधील देवडी गावाला अजूनही पुराच्या पाण्याचा धोका कायम आहे.  सिंदफणा नदी दुथडी भरून वाहत आहे. आंबेजोगाई आणि परळीतही जोरदार पाऊस झालायं. 

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातल्या भेंड खुर्द इथे पडलेल्या पावसामुळे दोन पाझर तलाव फुटले यामुळे नंदपूर गावात पाणी घुसले आहे. यामुळे अनेक शेतं पाण्यात वाहून गेली. तसंच अनेक शेतकऱ्यांच्या शेळ्या-मेंढ्या सुद्धा वाहून गेल्या. नदी नाले ओढ्यांना पूर आल्यामुळे तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

वाहून गेलेल्या दोघांचे मृतदेह सापडले

नांदेडमध्ये पुरात वाहून गेलेल्या दोघांचे मृतदेह सापडलेत. मुखेडमध्ये मोती नाला पुरातून कार नेण्याच्या प्रयत्नात असताना ही कार वाहून गेली. यात एक जण झाडावर चढून बचावला होता मात्र दोघेजण वाहून गेले होते. संदीप राठोड आणि भगवान राठोड अशी दोघांची नावं आहेत. 

जालना जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस

जालना जिल्ह्यातल्या अंबड आणि घनसावंगी तालुक्यात काल ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. या पावसामुळे अंबड तालुक्यातील डावरगाव, सुखापुरी लघु प्रकल्प, बारसवाडा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरल्यानं गल्हाटी नदी धोक्याची पातळी ओलांडलीय. नदी शेजारच्या पिठोरी सिरसगाव, करंजाळा, जालूरा, घुंगर्डे हादगाव या गावात नदीचं पाणी शिरलंय. ऊस, कपाशी ही पिकं पाण्याखाली गेलीयत. तर घनसावंगी तालुक्यातील राजेगाव भागात सोयाबीन पीक उध्वस्त झालंय. बंधारे देखील वाहून गेलेत. प्रशासनाने तात्काळ या नुकसानीचे पंचनामे करावे अन्यथा आत्महत्या करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय.

अकोला जिल्ह्यात जोरदार पावसामुळे शेकडो एकर शेतीचे नुकसान झालाय. कापूस, सोयाबिन, तूर, मुग आणि ज्वारीला फटका बसलाय. नदी नाल्याकाठची शेतजमिन खरडून निघालीय. मुर्तीजापुर विभागात सुमारे साडेचारशे एकर शेती बाधित झालीय. हायातोंडाशी आलेलं पिक वाया गेले आहे.