कॅबिनेट विस्तार आणि महामंडळ वाटपात अजित पवार गटाला शिंदे गटा इतकाच वाटा पाहिजे? महायुतीत नवा पेच

अजित पवार यांचा एक मोठा गट शिंदे फडणवीस यांच्यासह सत्तेत सहभागी झाला आहे. अजित पवार यांच्यासह 9 जणांना मंत्रीपद मिळाले आहे. आता अजित पवार गटाला सत्तेत आणखी वाटा पाहिजे असल्याची माहिती सुत्रांकडून मिळालेय. 

वनिता कांबळे | Updated: Oct 4, 2023, 05:59 PM IST
कॅबिनेट विस्तार आणि महामंडळ वाटपात अजित पवार गटाला शिंदे गटा इतकाच वाटा पाहिजे? महायुतीत नवा पेच title=

Maharashtra Politics : शिंदे फडणवीस सरकारसह सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवार गटाच्या अपेक्षा वाढत आहेत. कॅबिनेट विस्तार आणि महामंडळ वाटपात शिंदे गटा इतकाच वाटा  अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाला पाहिजे आहे. पालकमंत्री पदानंतर आता महायुतीत नवा पेच निर्माण झाला आहे.

मंत्रीमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नवी अट

लवकरच शिंदे फडणवीस आणि अजित पवार सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार होणार आहे. मंत्रीमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नवी अट घातल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली पाहिजे. या अटीमुळे शिंदे गटात पुन्हा एकदा अस्वस्थता पसरली आहे. 

शिंदे गटाइतका वाटा पाहिजे असल्याची अजित पवार गटाची मागणी

आता कॅबिनेट विस्तार झाल्यास शिंदे गटास जितके कॅबिनेट राज्य मंत्री आणि महामंडळ दिले जातील तितकेच राष्ट्रवादी पक्षाला दिले जावे अशी भूमिका अजित पवार गाटच्या राष्ट्रवादी पक्षाने घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. राष्ट्रावादीने ठेवलेल्या प्रस्तावामुळे महायुतील मित्र पक्षांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. 

अजित पवार अखेर पुण्याचे पालकमंत्री झाले

अजित पवार अखेर पुण्याचे पालकमंत्री झालेत. पुण्याच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला आहे. चंद्रकांत पाटलांची पुण्याच्या पालकमंत्रिपदावरुन उचलबांगडी करण्यात आलीय. १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आलीय. चंद्रकांत पाटील यांना सोलापूर आणि अमरावतीचं पालकमंत्रिपद देण्यात आलंय. पालकमंत्रिपदाचं वाटप होत नसल्यानं अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये प्रचंड नाराजी होती. दिल्लीत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांनी अमित शाहांची भेट घेतल्यानंतर पालकमंत्री तातडीनं जाहीर करण्यात आलेत. 

शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजपमधल्या वादामुळे राज्य सरकारची प्रतिमा मलिन होतेय 

शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजपमधल्या वादामुळे राज्य सरकारची प्रतिमा खराब होतेय.. ती सुधारा अशी सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.. दिल्ली दौ-यात शिंदे आणि फडणवीसांना या सूचना दिल्याचं समजतंय.. तसंच पालकमंत्री पदाची नियुक्ती, मंत्रिमंडळाचा विस्तार यावर लवकरच निर्णय करा अशी सूचनाही अमित शाहांनी शिंदे-फडणवीसांना केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शाहांमध्ये दिल्लीत साडेतीन तास बैठक झालीय. राज्यातील राजकीय घडामोडी, तसंच अजित पवारांच्या नाराजी नाट्याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. यासोबतच मंत्रिमंडळ विस्तार, आरक्षण, आमदार अपात्रतेवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.