'आम्हाला महाविकास आघाडीत का घ्यायचं नाही याचं काँग्रेसने उत्तर द्यावं'; वंचितचा इशारा

Lok Sabha Elections 2023 : महाविकास आघाडीत सहभागी करवून घेण्याच्या मुद्यावर 7 दिवसांत भूमिका स्पष्ट करा. नाहीतर आम्ही महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व 48 जागांवर निवडणूक लढवू, असा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे.

देवेंद्र कोल्हटकर | Updated: Sep 25, 2023, 04:00 PM IST
'आम्हाला महाविकास आघाडीत का घ्यायचं नाही याचं काँग्रेसने उत्तर द्यावं'; वंचितचा इशारा title=

Maharashtra Politics : काँग्रेसला (Congress) वंचित बहुजन आघाडीला (VBA) सोबत घेण्यास रस आहे का? असा सवाल वंचित बहुजन आघाडीने उपस्थित केला आहे. काँग्रेस अध्यक्ष खर्गे (mallikarjun kharge) यांना पाठवलेल्या पत्रावर उत्तराची ॲड. प्रकाश आंबेडकर (prakash ambedkar) यांच्याकडून वाट पाहिली जात आहे. उत्तर देण्यासाठी आणखी 7 दिवस देत आहेत अन्यथा सर्व 48 जागांवर निवडणूक लढवू असा इशारा वंचितने दिला आहे. 1 सप्टेंबर 2023 रोजी, वंचित बहुजन आघाडीचे  प्रवक्ते ॲड. प्रियदर्शी तेलंग यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना एक ई-मेल लिहिला जेव्हा काँग्रेस आणि त्यांचे सहयोगी तिसर्‍या इंडिया बैठकीसाठी मुंबईत होते. 

ई-मेल त्यांना दोन प्रमुख कारणांसाठी लिहिला होता. एक म्हणजे मुंबईत इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी वंचितला आमंत्रण पाठवले असल्याच्या त्यावेळच्या अफवा खोडून काढण्यासाठी काँग्रेसला विनंती करणे, आणि दुसरे म्हणजे वंचितचे दरवाजे खुले आहेत हे सांगणे. "आज भाजप-आरएसएस देशाला बरबाद करताहेत. जर इंडिया आघाडी भाजपा-आरएसएसच्या फुटीरवादी विचारसरणी आणि राजकारणाशी लढण्यास खरोखरच गंभीर असेल, तर प्रत्येक धर्मनिरपेक्ष आणि समविचारी पक्षांना सहभागी करून घेणे काँग्रेसचे कर्तव्य आहे. परत एकदा सांगतो, आमचे दरवाजे खुले आहेत,"  असे तेलंग यांनी लिहिलेल्या ई-मेलमध्ये म्हटले आहे. 

ई-मेल पाठवून आणि तेलंग यांच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर सार्वजनिक करून जवळपास एक महिना झाला आहे. परंतु मल्लिकार्जुन खर्गे किंवा काँग्रेसमधील त्यांच्या कोणत्याही सहकाऱ्याकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही. वंचित बहुजन आघाडीला हे जाणून घ्यायचे आहे की आम्हाला कधीतरी उत्तर मिळणार आहे का. मिळणार नसेल तर काँग्रेसने महाराष्ट्रातील जनतेला समजावून सांगावे की, काँग्रेसला वंचित आणि बहुजनांना आघाडीत सहभागी का करून घ्यायचे नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आणि 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 6.98 आणि 5.57 टक्के मते मिळविणाऱ्या पक्षाला आघाडीचे आमंत्रण का पाठवले गेले नाही किंवा सामील केले गेले नाही याचे स्पष्टीकरण त्यांनी द्यावे. 

"2019 पासून ज्या पक्षाची लोकप्रियता आणि मतदारांची संख्या वाढली आहे तो पक्ष युतीत का नाही याचे स्पष्टीकरण दिले पाहिजे. प्रामुख्याने, काँग्रेसने त्यांच्याकडून चालवल्या जाणार्‍या सर्व खोट्या बातम्या आणि खोट्या कथा तसेच सोशल मीडियावर नव्याने कामाला लावलेल्या ट्रोल्सकडून वंचित बहुजन आघाडीला आमंत्रण मिळाले आणि त्यांनी ते नाकारले हा खोटारडेपणा थांबवला पाहिजे.  जर काँग्रेसला आमच्या ई-मेलला उत्तर द्यायचे असेल आणि वंचितसह युती करायची असेल तर ते पुढील 7 दिवसांत उत्तर देऊ शकतात. अन्यथा, आम्ही सर्व 48 जागा लढवण्याच्या आमच्या योजनेनुसार पुढे जाऊ, कारण आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही सर्व 48 जागांसाठी उमेदवार निश्चित करण्याच्या मार्गावर आहोत," असा इशारा वंचितने दिला आहे.