भाजप नेत्या मेधा कुलकर्णींची उघड नाराजी, 'स्वतःच्या स्वार्थासाठी निष्ठावंतांसोबत...'

Medha Kulkarni: मेधा कुलकर्णी यांनी कोथरूडचे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर नाव न घेता ट्विटरवरून टीका केलीय. चांदणी चौकातील पुलासाठी आपण स्वत: फॉलोअप घेतला. मात्र आता त्याचं श्रेय कोथरूडचे विद्यमान नेते घेत असल्याचं ट्विट त्यांनी केलंय.

Pravin Dabholkar | Updated: Aug 12, 2023, 09:44 AM IST
भाजप नेत्या मेधा कुलकर्णींची उघड नाराजी, 'स्वतःच्या स्वार्थासाठी निष्ठावंतांसोबत...' title=

Medha Kulkarni: पुण्यात आज चांदणी चौक उड्डाणपुलाचं लोकार्पण केलं जाणारेय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थिती हा लोकार्पण सोहळा पार पडणारेय.  दरम्यान चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या लोकार्पण कार्यक्रमावरून भाजपमध्ये नाराजी नाट्य रंगलंय. लोकार्पण सोहळण्याच्या कार्यक्रम पत्रिकेतून आणि पोस्टर्सवर  कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांचा उल्लेख न केल्यामुळे त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केलीय. 

मेधा कुलकर्णी यांनी कोथरूडचे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर नाव न घेता ट्विटरवरून टीका केलीय. चांदणी चौकातील पुलासाठी आपण स्वत: फॉलोअप घेतला. मात्र आता त्याचं श्रेय कोथरूडचे विद्यमान नेते घेत असल्याचं ट्विट त्यांनी केलंय. त्यामुळे आजच्या कार्यक्रमापूर्वीच पुण्यातल्या भाजपात नाराजीनाट्य रंगल्याची जोरदार चर्चा सुरू झालीय. 

आज होणाऱ्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटील हेही उपस्थित राहणार आहेत. लोकार्पण सोहळ्याची तयारी आता पूर्ण झाली असून, कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. पुलाचं लोकार्पण झाल्यानंतर चांदणी चौकात होणारी सततची वाहतूक कोंडी आता कमी होण्याची शक्यता आहे. 

मुख्यमंत्री जाणार नाहीत

चांदणी चौक पूल लोकार्पणावरुन भाजपात नाराजीनाट्य पाहायला मिळतंय तर दुसरीकडे)) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही लोकार्पण सोहळ्याला जाणार नाहीत अशी माहिती मिळतेय. प्रकृती ठीक नसल्यानं पुण्याच्या कार्यक्रमात हजर राहणार नाहीत अशी माहिती सूत्रांनी दिलीय. मुख्यमंत्री शिंदे तापोळ्यात आहेत, 14 ऑगस्टपर्यंत मुख्यमंत्री गावीच आराम करणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिलीय. 

चांदणी चौक पूल तसंच इतर विकास कामांसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच व्यासपीठावर येणार आहेत. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांची उपस्थिती महत्त्वाची मानली जातेय. मात्र मुख्यमंत्री शिंदे उपस्थित राहणार की नाही? याबाबत संभ्रम कायम आहे.

काय आहे पोस्ट?

माझ्यावरील कुरघोड्या, डावलणे याबद्दल मी कधी जाहीर वाच्यता केली नव्हती. विश्वासात न घेता अचानक निर्णय घेतले तेव्हाही.. पण आता दुःख मावत नाही मनात.. वाटले बोलावे तुमच्याशी. चांदणी चौक उद्घाटन कार्यक्रमाची कोथरूडमधील पत्रके पहिली आणि खूप वाईट वाटले, असे मेधा कुलकर्णी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

अस्तित्वच मिटवायचा प्रयत्न?

चांदणी चौक या विषयाचे सर्वस्वी श्रेय नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांना आहे. पण मुळातच त्यांच्याकडे हा विषय नेला कोणी? स्वतः आदरणीय गडकरीजी काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात जाहीर भाषणात म्हणाले की, "तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी ताईंच्या सांगण्यावरून मी हा मुद्दा घेतला"..अनेक असे संदर्भ देता येतील की ज्यात 'कोथरूडचे आधुनिक कुठलेच नेते' या विषयी सहभागी नव्हते, तेव्हापासून सतत पाठपुरावा केला होता. आता मात्र सर्व श्रेय एकट्याचेच असल्यासारखे वागणारे कोथरूडचे सद्य नेते.. माझ्या सारख्यांचे अस्तित्वच मिटवून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. 

प्रक्रियेतून डावलले

मध्यंतरी पंतप्रधान, गृहमंत्री पुण्यात येऊन गेले. ठराविक लोकांना प्रोटोकॉल सोडून 'सर्व ठिकाणी' चे पास होते. मी राष्ट्रीय पदावर असून, विनंती करूनही मला दिला नाही... साधे कोथरूड च्या मंडल अध्यक्ष पदाच्या प्रक्रियेतही समाविष्ट श्रेणी मध्ये मी अपेक्षित नसेन तर याचा अर्थ स्थानिकांना मी नको आहे... गेली अनेक वर्षे मी हे सहन करीत आहे. त्या त्या वेळी गोष्टी वरीष्ठांपुढे मांडल्या आहेत.

निष्ठावान कार्यकर्तीला किंमत नाही?

देशापुढील आव्हाने, त्यासाठी करायचे अपेक्षित संघटन सोडून, तसेच मा मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी एकदिलाने कार्य करायचे सोडून, हे स्वतःच्या स्वार्थासाठी विघटनाचे, काटाकाटीचे राजकारण करत आहेत. माझ्या सारख्या निष्ठावान कार्यकर्तीला जाणीव झाली की माझी काही किंमत नाही आहे.

माझ्या बाबत त्यांना असे करणे सोपे जाते. माझ्याकडे ना मसल पॉवर, ना मनी पॉवर. मी एका सामान्य कुटुंबातून आलेली, विचारधारा घरून निष्ठेने काम करणारी कार्यकर्ती आहे. एका वैचारिकतेतून राजकारणात प्रवेश केला. आणि अगदी मनापासून सर्व समाजातील लोकांची कामे केली. आजही जे सोपवले आहे ते करीतच आहे. त्यावर असा बोळा फिरवला जातो आहे हे आता मात्र असह्य होऊन गेले आहे.