'स्वतःचं अपयश लपविण्यासाठी सत्ता असूनही...,' रोहित पवारांची अजित पवारांना उद्देशून पोस्ट, 'अशा व्यक्तीचे कार्यक्रम...'

Rohit Pawar Post for Ajit Pawar: रोहित पवार यांनी एक्सवर उपमुख्यमंत्री अजित पवारांना उद्देशून एक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्यांनी प्रतिगामी शक्तींकडून राजर्षी शाहू महाराजांच्या करवीर नगरीवरच वैचारिक आक्रमण करून इथलं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Jan 30, 2024, 12:55 PM IST
'स्वतःचं अपयश लपविण्यासाठी सत्ता असूनही...,' रोहित पवारांची अजित पवारांना उद्देशून पोस्ट, 'अशा व्यक्तीचे कार्यक्रम...' title=

Rohit Pawar Post for Ajit Pawar: सध्याच्या ईडीच्या चौकशीमुळे चर्चेत असणारे आमदार रोहित पवार यांनी एक्सवर उपमुख्यमंत्री अजित पवारांना उद्देशून एक पोस्ट लिहिली आहे. आमदार टी राजा यांना कोल्हापूररमध्ये आमंत्रित करण्यात आल्याचा त्यांनी विरोध केला आहे. अशा व्यक्तीचे कार्यक्रम कोल्हापुरसह महाराष्ट्रात कोठेही होऊ नये अशी अपेक्षा त्यांनी अजित पवारांकडे बोलून दाखवली आहे. प्रतिगामी शक्तींकडून राजर्षी शाहू महाराजांच्या करवीर नगरीवरच वैचारिक आक्रमण करून इथलं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

रोहित पवारांच्या पोस्टमध्ये काय आहे? 

"आपण नेहमीच पुरोगामी विचारांना आपल्या जीवनात प्राधान्य दिलं आहे. पुरोगामी विचारांचे उद्गाते शहर आणि महाराष्ट्राच्या सामाजिक न्यायाची वैचारिक राजधानी असलेल्या कोल्हापूर शहरात आपण नुकतंच जाऊनही आलात. कोल्हापूरने नेहमीच महाराष्ट्राला वैचारिक दिशा दिली परंतु याचाच राग मनात धरून प्रतिगामी शक्तींकडून राजर्षी शाहू महाराजांच्या करवीर नगरीवरच वैचारिक आक्रमण करून इथलं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु कोल्हापूर शहराची स्वतःची एक वैचारिक प्रतिकारशक्ती असल्याने अद्याप तरी प्रतिगामी शक्तींना यश आलेलं नाही," असं रोहित पवार म्हणाले आहेत. 

"याच प्रयत्नांचा भाग म्हणून आपल्या प्रक्षोभक द्वेषपूर्ण भाषणांसाठी प्रसिद्ध असलेले आमदार टी राजा यांना कोल्हापूरमध्ये बोलावण्यात आलंय. हे आमदार कोल्हापुरात येऊन इथलं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतील म्हणून अशा व्यक्तीचे कार्यक्रम कोल्हापुरसह महाराष्ट्रात कोठेही होऊ नये, अशी पुरोगामी विचारधारा जपणाऱ्या सामान्य कोल्हापूरकरांची इच्छा आहे," असं रोहित पवार म्हणाले आहेत. 

"दादा, आपण पुरोगामी विचारधारेचे आधारस्तंभ आहात. आदरणीय पवार साहेबांना सोडून प्रतिगामी शक्तींशी संगत केली असली तरी आपल्यातला पुरोगामी विचारांचा दादा अद्यापही तसाच आहे असं मानून टी राजा यांच्या कार्यक्रमास परवानगी देऊ नये ही सामान्य कोल्हापुरकरांच्या वतीने आपणास नम्र विनंती. स्वतःचं अपयश लपविण्यासाठी सत्ता असूनही सामान्यांच्या हिताला प्राधान्य न देता भाजपकडून केवळ महाराष्ट्र धर्म आणि महाराष्ट्राची विचारधारा पुसण्याचं काम केलं जात असल्याने आपण पुरोगामी विचारधारेचे पाईक व उपमुख्यमंत्री म्हणून या प्रश्नी लक्ष घालाल," अशी अपेक्षा रोहित पवारांनी व्यक्त केली आहे.