Good News : नंदुरबार जिल्हा पुन्हा ग्रीन झोनकडे, अखेरचा कोविड रुग्ण संसर्गमुक्त

 कोरोना विषाणूचा फैलावर होत असताना एक चांगली बातमी हाती आली आहे. नंदुरबार जिल्ह्याने शून्य गाठला आहे.  

Updated: May 19, 2020, 08:34 AM IST
Good News : नंदुरबार जिल्हा पुन्हा ग्रीन झोनकडे, अखेरचा कोविड रुग्ण संसर्गमुक्त title=
संग्रहित छाया

मुंबई / नंदुरबार : कोरोना विषाणूचा फैलावर होत असताना एक चांगली बातमी हाती आली आहे. नंदुरबार जिल्ह्याने शून्य गाठला आहे. सोमवारी जिल्हा शासकीय रुग्णालयातून अखेरचा कोविड रुग्ण संसर्गमुक्त होऊन बाहेर पडला. हा रुग्ण ठणठणीत बरा झाल्याने त्याला घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, अखेरचा रुग्ण घरी परत असताना रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर सर्वात जास्त आनंद दिसत होता. कारण त्यांनी करोनाविरुद्धच्या या युद्धातील पहिल्या टप्प्यात यश मिळवून १९ रुग्णांना त्यापासून दूर नेत त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलविले होते. त्यामुळे पुन्हा नंदुरबार जिल्हा ग्रीन झोनकडे येण्यास मदत झाली आहे.

दरम्यान, जवळपास एक महिन्यापूर्वी नंदुरबार जिल्ह्यात पहिला कोविडचा रुग्ण आढळल्यानंतर जिल्ह्यात काळजीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी जनतेशी सातत्याने संवाद साधत आपण यातून बाहेर येवू शकतो, हा विश्वास दिला. प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून जाहीर झालेल्या संचारबंदीतही जनतेला कमी त्रास कसा होईल याची दक्षता घेण्यात आली. तसेच नंदुरबार जिल्ह्याने शून्य गाठला आहे. सोमवारी जिल्हा शासकीय रुग्णालयातून अखेरचा कोविड रुग्ण संसर्गमुक्त होऊन बाहेर पडला, अशी माहिती जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकाच्या माध्यमातून दिली.

अनेक मजूर हाताला काम नसल्याने स्थलांतर करत आहेत. तर काही जण आपल्या गावी माघारी परतत आहेत. त्यामुळे नंदुरबारमध्ये कोरोनाचा प्रादुर्भवा होईल, अशी भीती होती. ती घरी ठरली. मात्र, योग्य नियोजन केल्याने आता कोरोनाचे संकट कमी झाला आहे. मात्र, यापुढे अधिक काळजी घ्यावी लागेल, अशी माहिती जिल्ह्याधिकारी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिली आहे.

जिल्हा कोरोना मुक्त करण्याच्या कामात अनेकांचे योगदान आहे. पोलीस विभागाने अहोरात्र परिश्रम करुन जिल्ह्याच्या सीमा संसर्गाच्यादृष्टीने सुरक्षित कशा राहतील याकडे विशेष लक्ष दिले. संचारबंदी मोडणाऱ्यांविरुद्ध प्रसंगी कठोर कारवाई करताना जनप्रबोधन आणि जनसेवेवरही भर दिला. रुग्णालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी धोका पत्करून रुग्णांची सेवा केली, प्रसंगी त्यांना मानसिक बळही दिले. प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी मजूरांची व्यवस्था असो वा नियमांची अंमलबजावणी, सतत व्यस्त होते. नगरपालिका आणि ग्रामपंचायतीची भूमिकादेखील महत्त्वाची होती. अनेक ठिकाणी फवारणी, स्वच्छता, सीमाबंदी यावर भर देण्यात आला. कौतुकाची बाब म्हणजे ग्रामीण जनतेतदेखील जागृती पाहायला मिळाली. ‘ॲन्टी कोविड फोर्स’च्या माध्यमातून मदतीसाठी अनेक तरुण पुढे आले. तर सेवाभावी संस्था आणि नागरिकांनी संकटाच्यावेळी मदतीचा हात पुढे केला.

शासनस्तरावर धान्यवाटप, मजूरांच्या भोजनाची सुविधा, बाहेरील राज्यातील आपल्या नागरिकांना परत आणणे आदी विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.  स्वच्छता कर्मचारी, आशा कार्यकर्ती, अंगवाडी सेविका, तलाठी, ग्रामसेवक, पत्रकार, रुग्णवाहिका चालक, परिचारिका अशा प्रत्येक घटकाची कामगिरी उपयुक्त ठरली आहे. प्रशासनाने दरम्यानच्या काळात नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून धान्य वाटप वेळेवर करण्याचे नियोजन केले.

 मनरेगाच्या माध्यमातून ३० हजार मजूरांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. जिल्हा बाहेरील आदिवासी बांधवांना आदिवासी विकास विभागाच्या सहकार्याने जिल्ह्यात सुरक्षितपणे परत आणले. आज महिन्याभरानंतर रुग्णसंख्या शून्यावर आली आहे. मात्र या संकटाला कायमचे दूर ठेवण्यासाठी अधिक दक्षता घेणे आणि स्वयंशिस्तीचे पालन करणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.