Ajit Pawar Oath: अजित पवारांच्या बंडावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले "आम्ही तिघं..."

Ajit Pawar Oath: अजित पवार यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडवली असून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार पाडलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Jul 2, 2023, 06:36 PM IST
Ajit Pawar Oath: अजित पवारांच्या बंडावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले "आम्ही तिघं..." title=

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार यांनी शिदे, फडणवीस सरकारला पाठिंबा दिला असून पुन्हा एकदा पहाटेच्या शपथविधीच्या आठवणी जाग्या केल्या आहेत. अजित पवार यांनी दुपारी 2.30 वाजता राजभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यामुळे राज्याला आता एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहेत. 

"जे घडलं आहे ते महाराष्ट्राच्या हिताचं घडलं आहे. यातून महाराष्ट्रात एक विकासाचा अध्याय लिहू. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात अजित पवार आणि मी तिघं मिळून महाराष्ट्राला पुढे नेऊ. अतिशय प्रगल्भ, पुरोगामी, विकास करणारं सरकार आम्ही देवू," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. 

Ajit Pawar Deputy CM Live Updates : थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषद

आज नेमकं काय घडलं?

आज सकाळी 11 वाजल्यापासूनच राज्यात वेगवान घडामोडी सुरु झाल्या होत्या. सर्वात आधी अजित पवारांचे पीए राजभवनात दाखल झाले होते. यानंतर देवेंद्र फडणवीसही सागर बंगल्यावरुन राजभवनासाठी निघाले. यामुळे एकच चर्चा सुरु झाली होती. काही वेळातच छगन भुजबळ आणि राष्ट्रावादीचे इतर आमदार पोहोचल्यानंतर चित्र स्पष्ट झालं. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे पोहोचल्यानंतर सर्वात शेवटी अजित पवार दाखल झाले आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासह एकूण 9 आमदारांचा शपथविधी यावेळी पार पडला.

अजित पवार का होते नाराज?

 

शरद पवार यांनी अध्यक्षपद सोडत असल्याची घोषणा केल्यानंतर अजित पवार वगळता सर्वांनीच त्यांच्या निर्णयाला विरोध दर्शवला होता. तेव्हापासूनच अजित पवार यांच्या नाराजीची चर्चा सुरु झाली होती. दरम्यान, शरद पवार यांनी पक्षांतर्गत विरोधानंतर निर्णय़ मागे घेतला होता. त्यानंतर अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी आपली इच्छा नसताना विरोधी पक्षनेतेपद दिलं असून, आपल्याकडे पक्षांतर्गंत इतर जबाबदारी द्यावी अशी मागणी केली होती. तसंच आपल्याला प्रदेशाध्यक्षपदी काम करण्याची इच्छा असल्याचं सूचक विधान केलं होतं. यासाठी त्यांनी अल्टिमेटमही दिला होता. यानंतर अखेर आज त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे.