मुंबईत निर्बंध कायम तर राज्यातले 21 जिल्हे सोमवारपासून निर्बंधमुक्त

लॉकडाऊनमध्ये आणखी शिथिलता येत आहे. 'ब्रेक द चेन'अंतर्गत लावण्यात आलेले निर्बंध हळूहळू हटविण्यात येत आहेत.  

Updated: Jun 12, 2021, 07:13 AM IST
मुंबईत निर्बंध कायम तर राज्यातले 21 जिल्हे सोमवारपासून निर्बंधमुक्त   title=
संग्रहित छाया

मुंबई : लॉकडाऊनमध्ये आणखी शिथिलता येत आहे. 'ब्रेक द चेन'अंतर्गत लावण्यात आलेले निर्बंध हळूहळू हटविण्यात येत आहेत. राज्यातले 21 जिल्हे सोमवारपासून निर्बंधमुक्त होत आहेत. पण रुग्णसंख्या अधिक असलेल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, कोल्हापूर या सहा जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम राहणार आहेत.

पहिल्या टप्प्यात 12 जिल्ह्यांमधील निर्बंध रद्द झाले होते. आता ही संख्या 21 झाली आहे. निर्बंध किती ठेवायचे याचा निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. अहमदनगर, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, परभणी, सोलापूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ मध्ये जनजीवन सुरळीत सुरू होईल. 

मुंबई जिल्ह्यात रुग्ण घटूनही महापालिकेने सावध पवित्रा घेतला आहे. ठाणे, पुणे मात्र निर्बंधमुक्त होत आहे. कोरोनाबाधितांचे आठवड्याचे प्रमाण लक्षात घेत आणि खाटांची उपलब्धता या आधारे ठाणे आणि पुण्यासह 21 जिल्ह्यांमधील निर्बंध सोमवारपासून शिथिल होणार आहेत. मात्र, मुंबईत गर्दी टाळण्यासाठी सध्याचेच निर्बंध कायम राहणार आहेत. मुंबई महापालिकेने जोखीम टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. मॉल्स, चित्रपटगृहे, नाट्यगृहे बंदच राहणार आहेत. दुकाने खुली ठेवण्याची वेळ दुपारी 4 वाजेपर्यंतच राहणार आहे. तर  सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासावरील बंदीही कायम असणार आहे.

पहिला स्तर -

कोरोनाबाधितांचे आठवड्याचे प्रमाण 5 टक्क्यांपेक्षा कमी आणि 25 टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजनसह रुग्ण असतील अशा जिल्ह्यांतील सर्व निर्बंध हटविण्यात आलेत. यात अहमदनगर, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, परभणी, सोलापूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे.

दुसरा स्तर -

कोरोनाबाधितांचे प्रमाण 5 टक्क्यांपेक्षा कमी आणि 25 ते 40 टक्क्यांच्या दरम्यान रुग्ण असतील अशा जिल्ह्यांमध्ये सर्व दुकाने उघडी ठेवण्यास मुभा दिली आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि पुणे या दोन जिल्ह्यांचा यात समावेश.
 
तिसरा स्तर -

कोरोनाबाधितांचे आठवड्याचे प्रमाण 5 ते 10 टक्क्यांच्या दरम्यान आणि ऑक्सिजनसह 40 टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण असतील असे जिल्हे आणि महापालिकांचा समावेश आहे. यामध्ये प्रामुख्याने पिंपरी-चिंचवड महापालिका, अकोला, औरंगाबाद, बीड, गडचिरोली, नाशिक, उस्मानाबाद, सांगली या जिल्ह्यांचा समावेश होतो. मात्र ठाणे जिल्ह्यातील ठाणे शहर आणि नवी मुंबई शहर तसेच औरंगाबाद शहर स्तर दोनमध्ये असल्याने सध्या तेथील निर्बंध हटविण्यात आले आहेत. 

 चौथा स्तर -

चौथ्या टप्प्यात आठवड्याचे कोरोना बाधितांचे प्रमाण 10 ते 20 टक्क्यांदरम्यान आणि रुग्ण 60 टक्क्यांपेक्षा अधिक  असतील, अशा जिल्ह्यांचा समावेश होतो. या टप्प्यात पुणे (पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका वगळून), रायगड, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश होतो. या जिल्ह्यात संचारबंदी राहील. येथे अत्यावश्यक सेवेतील दुकाने दररोज सकाळी 7 ते 4 वाजेपर्यंत सुरू राहतील.

 पाचवा स्तर -

पाचव्या स्तरात बाधितांचे आठवड्याचे प्रमाण 20 टक्क्यांपेक्षा अधिक आणि  ऑक्सिजनच्या 75 टक्क्यांपेक्षा अधिक खाटा भरलेल्या असतील तर त्या जिल्ह्यांचा या स्तरात समावेश होतो.