बाप की हैवान! पाणी भरत नाही म्हणून वडिलांनी केली चिमुकल्याची हत्या

 वडिलांनीच दहा वर्षीय मुलाची गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना नागपुरात उघडकीस आली आहे. कोराडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरदेवी परिसरात घडलेल्या या घटनेनंतर समाजमन सुन्न झाले आहे.

Updated: May 24, 2022, 09:46 AM IST
बाप की हैवान! पाणी भरत नाही म्हणून वडिलांनी केली चिमुकल्याची हत्या title=

 नागपूर : वडिलांनीच दहा वर्षीय मुलाची गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना नागपुरात उघडकीस आली आहे. कोराडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरदेवी परिसरात घडलेल्या या घटनेनंतर समाजमन सुन्न झाले आहे. संतलाल मडावी असे नराधम दारुड्या बापाचे नाव आहे. 

 गुलशन उर्फ गबरू असे मयत दहा वर्ष मुलाचे नाव आहे. मूळचे मध्यप्रदेशातील संतलाल मडावीला दारूचे व्यसन जडले होते. नव-याच्या या व्यसनाला त्रासून त्याची पत्नी घरून निघून गेली होती.  

आईने घर सोडल्यानंतर गुलशन आणि त्याची बहीण दोघेही संतलालसोबत रहात होते. दारूच्या आहारी गेलेला संतलाल मुलांना नेहमीच मारहाण करायचा. रविवारी, गुलशनने घरी पाणी भरले नाही म्हणून संतलाल यांनी गुलशनला हातबुक्तीने मारहाण केली. 

 दारूच्या नशेत असलेल्या वडिलांनी पाण्यासाठी गुलशनला एवढे मारले की तो बेशुद्ध झाला. त्यानंतरही वडिलांचे मन भरले नाही त्यांनी त्याचा दोरीने गळा आवळला. यात त्याचा मृत्यू झाला. 

 मुलाची हत्या केल्यानंतर बाजारात गेल्याचा बनाव

 गुलशनचा मारहाणीत मृत्यू झाल्यानंतर वडीलांना पोलिसांची भीती वाटायला लागली. संतलाल यांच्या घरी त्याचे भाऊ आणि वहिनी येणार होते. त्यामुळे ते घरी येण्यापूर्वी संतलालने बाजारात जाण्याचा बनाव निर्माण केला. ते घरी आले त्यावेळी गुलशन घरात बेशुद्ध पडलेला दिसला. त्यानंतर त्याला मेयो रुग्णालयात पाठविण्यात आले. येथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

 गुलशनच्या गळ्यावर निशाण सापडल्यामुळे पोलिसांनी त्याच्या बहीणीची विश्‍वासात घेवून विचारपूस केली असता सर्व वास्तव पुढे आले. त्यानंतर कोरडी पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे. दरम्यान एकीकडे भावाची वडिलांनीच हत्या केली तर दुसरीकडे वडीलांमुळेच आई पण सोडून निघून गेली अशात गुलशनची बारा वर्षीय बहीण मात्र आता संपूर्ण मडावी कुटुंबात एकटीच राहिली आहे.

Tags: